
Maharashtra political news : शिवसेना नेता तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी शिवसेना मंत्र्यांनी खदखद व्यक्त केली. अजितदादांकडून खात्यांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. एकनाथ शिंदेंनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करेल, असे आश्वासन दिले.
या बैठकीनंतर दोनच दिवसात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोणत्याही प्रकारची नाराजी किंवा निधी मिळत नाही, असे काहीच नाही. उलट अजितदादांकडून माझ्या विभागाला नेहमीच भरभरून निधी मिळाला, अशी भूमिका मांडली. यामुळे शिवसेनेतील मंत्रीच अजितदादांच्या मुद्यावरून एकनाथ शिंदेंना महायुतीत तोंडघशी पाडत, तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित दोन दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथी गृहावर शिवसेना मंत्र्यांची बैठक झाली. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरून शिवसेना मंत्र्यांनी ही बैठक गाजवली. विकासकामांना पैसे देत नाही, महायुतीमध्ये सर्व मंत्र्यांना समान अधिकार असले पाहिजेत, अशा अनेक तक्रारी झाल्या. या बैठकीनंतर दोनच दिवसांत शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजितदादांच्या समर्थनात एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात, ठाण्यात विधान केलं आहे.
मंत्री प्रताप सरनाईक ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित जागतिक पर्यावरणदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी ते म्हणाले, "कोणत्याही प्रकारची नाराजी किंवा निधी मिळत नाही, असे काहीच नाही. उलट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माझ्या विभागाला नेहमीच भरभरून निधी दिला आहे". थोड्याफार प्रमाणात कुरबुरी असतात. मात्र त्याचे राजकीय भांडवल करू नये, असेही सरनाईक यांनी म्हटले.
'राज्यात सध्या छोटा भाऊ आणि मोठा भाऊ, अशी चर्चा केली जात आहे. परंतु आम्ही छोटा किंवा मोठा भाऊ नसून आम्ही जुळे भाऊ आहोत. त्यामुळे जुळ्या भावांची भूमिका आम्ही यशस्वीपणे बजावू', असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाण्याच्या माध्यमातून आयुक्त चांगले काम करीत असून, रेमंड इथल्या महापालिकेच्या नवीन नियोजित वास्तूच्या ठिकाणी बांबू व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली ठाण्यात एक लाख वृक्षांच्या लागवडीचा संकल्प करण्यात आल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, विकासाच्या दृष्टिकोनातून काही वृक्ष काढावे लागतात, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यातही ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या ठिकाणी कमीत कमी वृक्षतोड, कशा प्रकारे होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. 10 झाडे तोडली, तर हजारो वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आल्याचे देखील त्यांनी या वेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.