
Mumbai News, 23 Oct : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, महाविकास आघाडीत राज यांना एन्ट्री दिली जाणार का? याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ठाकरेंसोबत युती करणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
'राज ठाकरे काय, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही आघाडी करून लढणार नाही, असं जगताप यांनी म्हटलं आहे. शिवाय काँग्रेसच्या इतर काही नेत्यांनी देखील राज ठाकरेंना विरोध केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
'मुंबई महापालिका किंवा स्थानिकच्या निवडणुकीत कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही मित्र पक्षांना अडचणीत आणणार नाही. राज ठाकरेंचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे. या मुंबईसाठीच संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती.
त्यात सर्व पक्ष एकत्र आले होते. काँग्रेसच्या नेत्यांना हा इतिहास समजून घेणे फार गरजेचं असून आताही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण मुंबईत आहे', असं संजय राऊत म्हणाले. शिवाय जर आम्हाला काय बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलू.
या चारही प्रमुख लोकांशी या विषयावर अद्याप साधी चर्चा देखील झालेली नाही. त्यामुळे उगाच त्याच्यावर अकांडतांडव करण्यात अर्थ नाही, असं म्हणत त्यांनी जगताप यांना डिवचलं. तसंच यावेळी राऊतांनी आम्हाला काँग्रेसचा पंतप्रधानच करायचा होता. पण होऊ शकला नाही, असं म्हणत आम्ही दिल्लीत काँग्रेसलाच पाठिंबा देतो.
त्यावेळी आम्ही काही विरोधात जात नाही. शिवाय काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला राहुल गांधींनाच पंतप्रधान करायचे आहे ही आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे हे महाशय मुंबईच्या महापौराबद्दल काय घेऊन बसलेत? असा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
शिवाय भाजपला रोखणं ही आमची भूमिका असून महापौर हा मराठी मातीतला होण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. मुंबईवर गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर आहे. यासाठी आम्ही काँग्रेसचे देखील सहकार्य घेतले हे विसरता येणार नाही, असंही राऊत म्हणाले. दरम्यान, बिहारमध्ये राज ठाकरे नाहीतर तरीही तिथे बऱ्याच ठिकाणी तेजस्वी यादवचं वाजलं आहे आणि वेगवेगळ्या निवडणुका लढत आहेत.
निवडणुका जवळ आल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात भांडण सुरू आहे. मग तिथे राज, उद्धव ठाकरे आहे का? आम्हाला हे नको, ते नको. हे एक दिवसाचे प्रसिद्धीचे वाक्य असतात. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. त्यामुळे काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वाने मुंबईवरचं पुढील संकटाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.