Sushma Andhare News : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतील जनता पक्षांच्या घटलेल्या जागांची जबाबदारी स्वीकारत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत संघटनेत सक्रीय होण्याचे जाहीर केले. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर भाजपच्या एकाही नेत्याने पराभवाची जबाबदारी घेत फडणवीसांच्या मागे उभे राहण्याची तयारी दाखविली नाही. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डिवचले आहे. वाल्या कोळ्याच्या गोष्टीचे उदाहरण देत अंधारे यांनी कठीण समय येता, कोण कामास येतो, अशी विचारणा फडणवीस यांना केली आहे.
सोशल मीडियावर फेसबुक पोस्ट करून शिवसेना (ShivSena) ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांना सध्याच्या परिस्थितीत भाजपचे नेते कोणीही तुमच्या मागे उभे राहत नसल्याचे म्हंटले आहे. वाल्या कोळ्याने म्हणे अनेकांना लुटले, दरोडे घातले, काहींना जीवे मारले. एकदा जंगलातून जाताना वाल्या कोळ्यासमोर ऋषीमुनी आले. त्यांना मारण्यासाठी वाल्याने शस्त्र उगारले तेव्हा ते ऋषी त्याला म्हणाले, हे पाप कोणासाठी करत आहे. त्यावर वाल्याने माझ्या कुटूंबासाठी, आई, वडील, बायको, मुलासाठी असे उत्तर दिले. त्यावर उद्या तुझ्यावर संकट आले तर या पापात ते भागीदार होतील का? जा त्यांना विचारून ये, असे ऋषीमुनी त्याला विचारून येण्यास सांगितले. त्यावर घरी जाऊन सर्वांना पापात भागीदार होणार का, अशी विचारणा केल्यानंतर प्रत्येकाने काय उत्तर दिले, हे जाणकारांना माहित आहेच.
ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील भाजपाचा (BJP) पराभव स्वीकारण्याचा मानभावीपणा दाखवत राजीनाम्याची भाषा करून एक दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र देवेंद्रजी या सगळ्या प्रकरणात एकटे पडले. कोणी त्यांच्या मागे उभे देखील राहिले नाही. फडणवीसांकडून अनेकांनी लाभाची पदे घेत मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतला.या लाभार्थ्यांच्या यादीतला एकटे मोहित कंबोज आणि संपूर्ण पक्षाकडून उपेक्षित राहिलेले केशव उपाध्ये वगळता फडणवीस यांच्या जीवावर अनेकांनी चिक्कार लाभाची पदे घेतली आणि कोट्यावधीची प्रॉपर्टी जमा केली.
या लाभार्थी व्यक्तींमधील काही जणांनी तर मुंबईत 15 ते 20 कोटी रूपयांचे फ्लॅट घेतले. मात्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविल्यानंतर लाभार्थ्यांपैकी एक जण देखील यावर बोलताना दिसत नाही. जाणकरांनी काय अचुक लिहून ठेवलंय, 'कठीण समय येता कोण कामास येतो?'अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. अंधारे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टची जोरदाप चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.