मुंबई : दसरा मेळाव्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष राज्याने पाहिला. त्यानंतर आता धनुष्यबाण कुणाला मिळणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. खरी शिवसेना (shiv sena) आमचीच आहे, असा दावा शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून केला जात आहे. (shiv sena latest news)
शिवसेना उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची? पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार? याची लढाई सध्या निवडणूक आयोगाकडे सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी ७ ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार याचा निर्णय काही तासात होण्याची शक्यता आहे. उद्या (7 तारखेपर्यंत) शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे.
निवडणूक आयोगाने म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत उद्या (शुक्रवारी) संपते आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची आज (गुरुवारी) एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत वकील उपस्थित असणार आहेत.
शिवाय निवडणूक आयोगाकडे आज म्हणणे मांडायचे की उद्या यावर खल होणार असल्याचे समजते. त्यानंतर कागदपत्रे दाखल करण्यासाठीही ठाकरे गटाकडून वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे.
धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं तर नवीन चिन्हावर दोन्ही गटाकडून विचारविनिमय सुरु आहे. ठाकरे गटाकडून सध्या ढाल आणि तलवार चिन्ह घेण्यावर विचार सुरू आहे. तर शिंदे सेना तलवार हे चिन्ह घेण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. दसरा मेळाव्यातही एकनाथ शिंदेच्या भाषणापूर्वी एक तलवारही व्यासपीठावर आणण्यात आली होती. ही त्याची तयारी असल्याची चर्चा आहे.
अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्यापासून सुरू होणार आहे. या काळात चिन्हाचा निर्णय काय होतो, याकडे सगळ्याचे लक्ष आहे. हे पाहता धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबतची भूमिका मांडली आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह व पक्षाच्या वैधतेबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवताच महाराष्ट्रातील बेइमान गटाने ‘व्ही फॉर व्हिक्टरी’च्या खुणा दाखवत विजय साजरा केला हे धक्कादायक आहे! धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेस मिळणार नाही, ते आम्हाला मिळेल, असे बेइमान गटाचे लोक आधीपासूनच सांगत होते व आताही गुलाबराव पाटील यांच्यासारखे मंत्री जाहीर कार्यक्रमांतून तेच तेच सांगत आहेत. धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला मिळणार नाही व त्यानंतर शिवसेनेचे आणखी पाच-सहा आमदार आमच्या गटात येतील, असे गुलाबराव पाटील सांगतात. याचा अर्थ शिवसेना फोडतानाच हा निर्णय ठरला होता व निवडणूक आयोग जरी घटनात्मक संस्था असली तरी त्या घटनात्मक संस्थेचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, असे जर यावरून कोणी म्हटले तर? नेमक्या याच कारणासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे, असे शिवसेनेने स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.