
Mumbai News : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील चाकू हल्ल्यात घुसखोरी करून आलेला बांगलादेशी मोहम्मद शरीफुल्ल इस्माल शहजाद ऊर्फ विजय दास (वय 30) याला मुंबई पोलिसांनी अटक केली. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
"मुंबई पोलिसांचा आरोपी बांगलादेशी असल्याचा दावा हा राजकीय आहे. तुम्ही काहीतरी लवपत आहात. दुसऱ्या कोणावर तरी खापर फोडत आहात. भाजपच्या या लोकांना मला म्हणायचे आहे की, हा भाजपचा डाव आहे का?", असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई इथं सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी निघाला, याकडे लक्ष वेधले. त्यावर संजय राऊत यांनी देशात बांगलादेशींची सुरू असलेल्या घुसखोरीवरून आणि देशात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.
संजय राऊत म्हणाले, "मुंबई पोलिसांचा हा राजकीय दावा आहे. बांगलादेशी देशात जर घुसले असतील, आणि ते असे गुन्हे करत असतील, तर त्याला सर्वश्री पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे सरकार जबाबदार आहे. बांगलादेशी मुंबई, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये घुसले आहेत. एक बांगलादेशी चाकू होते. अत्यंत सुरक्षित असलेल्या सैफ अली खान याच्या घरात घुसतो, त्याच्यावर हल्ला करतो, हा सर्व प्रकार अत्यंत रहस्यमयी आहे". तुम्ही काहीतरी लपवता आहात. त्याचे खापर कुणावर तरी फोडता आहात, हे अत्यंत चुकीचे आहे. मग असे म्हणायचे की, हा भाजपचा डाव आहे, अशी शंका उपस्थित करून संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली.
बीडमधील संतोष देशमुख, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येत बांगलादेशी होते का? डोकं ठिकाणावर ठेवून बोला. चिलीम मारून बोलू नका. बांगलादेशी या देशाला धोका असून, त्यांना ताबडतोब देशाबाहेर काढले पाहिजे. सर्वात अगोदर बांगलादेशाच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांना जो आश्रय दिला आहे. त्यांना बाहेर काढणार का बांगलादेशी म्हणून, हे पंतप्रधानांनी सांगावं. देशातून सब बांगलादेशींना हटवा. प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहात, असे म्हणत किरीट सोमय्या बांगलादेशींना हटवतोय, सर्वात अगोदर त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या कोणी केली, हे हिंमत असेल, तर विचारा, सोमनाथ सूर्यवंशी यांना कुणी मारलं हे विचारणार का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
'मुंबई महापालिकेची निवडणूक लढायची आहे, म्हणून आता बांगलादेशी... बांगलादेशी... करत आहेत. बांगलादेशींविरुद्ध सर्वात अगोदर आम्ही लढाई सुरू केली. आम्हाला विरोध करणारे कोण होते. पार्लमेंटमध्ये आम्हाला गप्प बसवलं गेलं. त्यावेळी भाजपचे सरकार होते. त्यावेळी आम्हाला बोलू दिलं नाही. सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याचा तपास पोलिस करत आहे. भाजप नव्हे. त्यात राजकारण करू नका. हल्ल्याप्रकरणी भाजपने काय वेगळी एसआयटी स्थापन केली आहे का?', अशी बोचरा सवाल संजय राऊत यांनी केला.
'कालपर्यंत सैफ अली खान-करिना कपूर हे लव जिहादचं प्रतीक होता. त्यांच्या मुलांच्या नावावरून देखील त्यांच्यावर हल्ले करत होता. आता बांगलादेशीने हल्ला केल्याने पुळका आला काय? हा आंतरराष्ट्रीय कट, कसला कट, या देशात, राज्यात रोज शेकडो हल्ले होत आहे. तुम्ही अपयशी आहात. गृहमंत्रालयात राज्यात आणि देशात अपयशी आहात. बांगलादेशी देशात घुसले असेल, तर हे अमित शाह यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. बाॅलिवूड कोणी असुरक्षित नाही. सर्व सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील मुंबईतील अंडरवर्ल्डचा बाॅलिवूडला धोका होता, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणि मनोहर जोशींचे सरकार असताना, अंडरवर्ल्ड पूर्ण मोडून काढलं आहे', असेही संजय राऊत यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.