.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद होण्याचा फटका बसल्यानंतर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने डावपेच बदलत थेट बंडखोर उमेदवारांना पाठिंबा देण्याची रणनीती अवलंबली आहे. दोन प्रभागांत अधिकृत उमेदवार रिंगणाबाहेर पडल्याने पक्षाने तातडीने पर्यायी आघाडी उघडत निवडणूक लढतीत आपली उपस्थिती कायम राखली आहे. या निर्णयामुळे सत्ताधारी युतीच्या उमेदवारांसमोर नव्या आव्हानाचे चित्र निर्माण झाले आहे.
ठाण्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. प्रभाग क्रमांक ५ (ब) मधून शिवसेना (उबाठा)चे उमेदवार दादाभाऊ रेपाळे यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने वसंत विहार परिसरात पक्षाची कोंडी झाली होती. ‘उमेदवार संपर्कात नाहीत, ’ असा आरोप नेते राजन विचारे यांनी यापूर्वीच केला होता. त्यामुळे या प्रभागात युतीच्या उमेदवार जयश्री डेव्हिड यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते; मात्र भाजपकडून इच्छुक असलेले ठाणे शहर ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस विक्रम चव्हाण यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करीत चित्र बदलले.
पण चव्हाण यांच्यासोबत सुचकाच्या अर्जावरून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या कथित गैरप्रकारावरून चव्हाण यांनी निवडणूक कार्यालयात आक्रमक भूमिका घेतली. याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. अखेर चव्हाण यांचा अर्ज वैध ठरवत त्यांना पुन्हा रिंगणात संधी मिळाली. त्यामुळे शिवसेनेच्या जयश्री डेविड यांची बिनविरोध निवड थोडक्यात हुकली. या घडामोडीनंतर शिवसेनेना (उबाठा) पक्षाने चव्हाण यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला.
पुढे राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या उपस्थितीत चव्हाण यांचा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश झाला असून, स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. शिवसेना(उबाठा) पक्षाने थेट सत्ताधारी महायुतीतील बंडखोरांना आपलेसे करत महायुतीसमोर तगडे आव्हान उभे केले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना शह देण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
वागळे इस्टेटमधील प्रभाग क्रमांक १६ (ड) मध्येही असे राजकीय वळण लागले आहे. माजी नगरसेवक माणिक पाटील यांना यंदा उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. काँग्रेसमधून आलेले मनोज शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे पाटील नाराज होते; मात्र या प्रभागात शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर पक्षाने पाटील यांनाच पाठिंबा देत त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा)पक्षाने महायुतीसमोर आव्हान उभे केल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
मागील निवडणुकीत माणिक पाटील यांनी शिंदे कुटुंबातील उमेदवाराचा पराभव केला होता. त्यामुळे या प्रभागात यंदा चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत. अर्ज बाद होण्याच्या धक्क्यानंतरही मैदान न सोडता बंडखोरांच्या माध्यमातून ताकद टिकवून ठेवण्याचा ठाकरेंच्या पक्षाचा हा डाव ठाण्यातील निवडणूक राजकारणात निर्णायक ठरतो का, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.