
Mumbai News: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन गंभीर आरोप केले आहेत. यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो,धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असं विधान केल्यामुळे नवा वाद पेटला आहे. याचवरुन केंद्रीय मंत्र्यांनी विजय वडेट्टीवारांवर (Vijay Wadettiwar) कारवाई करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच पत्र लिहिलं आहे.
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. यामुळे आता वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी वडेट्टीवारांवर कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे.
करंदलाजे म्हणाल्या, विजय वडेट्टीवार यांनी देशविरोधी आणि दहशतवाद्यांना समर्थन मिळेल असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी वडेट्टीवारांना खडेबोल सुनावल्यानंतर थेट केंद्रीय मंत्र्यांकडूनही कारवाईची मागणी करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरील कारवाईसाठीचा दबाव निश्चितच वाढला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (ता.22) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारला. त्यानंतर पर्यटक हिंदु असल्याचं समोर आल्यावर त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, काही प्रत्यक्षदर्शी पर्यटकांनी म्हटलं होतं. यावरुन आता राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रियांनी राजकारण तापवलं आहे.
चौफेर टीका झाल्यानंतर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्यावरुन खुलासाही केला होता. यात त्यांनी दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकारास इतर कोणताही रंग देण्यात येऊ नये,असेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं होतं.
तर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. काश्मीर येथील दहशतवादी हल्ला प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस आहे. काँग्रेस नेते आणि पाकिस्तान नेत्यांची भाषासारखीच आहे. देशभक्त जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे थांबवा,असंही सावरकर यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.