Vijay Wadettiwar On BJP: अशा वाचाळवीर नेत्यांमुळे भाजप..., लोकसभा निकालानंतर वडेट्टीवारांचं टीकास्र; म्हणाले...
Vijay Wadettiwar On Lok Sabha Result: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. राज्यात मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मतदारांचे आभार मानत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील राज्यातील भाजपच्या वाचाळवीरांमुळेच भाजप महाराष्ट्रात एक आकड्यावर आली असल्याची टीका केली आहे.
मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, राहुल गांधी यांनी अथक परिश्रम घेऊन भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेमुळेच आम्हाला अभूतपूर्व यश मिळालं. शरद पवारांना भटकती आत्मा म्हणणाऱ्यांना पवार साहेबांनी 'बाप बाप होता है' हे दाखवून दिले. ज्यांनी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली सेना म्हणून हिणवले त्यांनादेखील जनतेने धडा शिकवला.
महाविकास आघाडीच्या सामूहिक प्रयत्नांचे हे मोठे यश असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमित जनतेने जुमलेबाजांना गाडले आहे. देशातील जनतेने लोकशाही वाचवली. पाशवी बहुमताच्या जोरावर संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने हद्दपार केली."
तसंच देशातील जनतेला संविधान आणि लोकशाही वाचविण्याची चिंता होती. त्यामुळे हे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी जनतेने जुमलेबाज जोडीला बहुमत दिले नाही. सत्तेसाठी एकत्र आलेल्या जुमलेबाजांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवार करून पक्ष फोडले, विनाकारण नेत्यांना तुरूंगात डांबले. कायद्याचा गैरवापर केला. त्यामुळे जनतेने त्यांना धडा शिकवला. या सत्ताधाऱ्यांच्या संकटापुढे जे टिकले त्यांचं कौतुक आहे. परंतु जे गेले त्यांचं राजकारण संपणार असल्याचा इशारादेखील वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.
काँग्रेस संकटात असताना विदर्भातील जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्याने विदर्भात महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला. ज्या भागातून राहुल गांधी यांची यात्रा गेली त्या ठिकाणी यश मिळाले. मात्र, याउलट ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या त्या ठिकाणी भाजपचा दारूण पराभव झाला. त्यामुळे जनतेने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्याचे सिद्ध झालं असल्याचंही ते म्हणाले.
वाचाळवीरांमुळेच भाजप महाराष्ट्रात एक आकड्यावर
भाजपच्या आशिष शेलार यांची मला चिंता वाटत असून ते कधी संन्यास घेतात याची जनता वाट पाहते असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. तर उदय सामंत जातीयवादी बोलत आहेत. त्यांना फक्त चिरा (दगड), आंबा, मासे इतकीच माहिती आहे. अवकाळी पावसासारखा त्यांचा आनंद आहे, असं म्हणत त्यांनी शेलार सामंतांचा समाचार घेतला. मोदी लाट संपली आहे. याचे भान या नेत्यांना नाही. अशा वाचाळवीरांमुळेच भाजप महाराष्ट्रात एक आकड्यावर आली असून अशा नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.