

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिवपदाचा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला गोंधळ अखेर संपला आहे. सामान्य प्रशासन विभागाने महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. हे पद रिक्त राहिल्यामुळे आयोगातील परीक्षा, निकाल आणि मुलाखती रखडल्या होत्या, ज्याचा थेट फटका हजारो स्पर्धा परीक्षार्थींना बसत होता. मात्र आता रखडलेले निकाल आणि लांबणीवर पडलेल्या मुलाखतींच्या प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
‘एमपीएससी’ ही घटनात्मक संस्था असून, यामध्ये अध्यक्ष आणि सचिव ही महत्त्वाची पदे आहेत. आयोगाच्या परीक्षा, निकाल, शिफारशी, न्यायालयीन प्रकरणे, नवीन नियमावली लागू करणे आदी सर्व जबाबदाऱ्या सचिवांकडे असतात. सचिव हे कार्यालयीन प्रमुखही असतात. आयोगाच्या माजी सचिव डॉ. सुवर्णा खरात यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. मधल्या काळात अवर जिल्हाधिकारी जगन्नाथ वीरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून सचिव पद रिक्त असल्याने आयोगाचा संपूर्ण कार्यभार वाऱ्यावर होता.
या सर्वांचा परिणाम आयोगाच्या विविध परीक्षा आणि निकालांवर झाला. अनेक परीक्षांचे निकाल पाच ते सहा महिन्यांपासून रखडले, तर निकाल जाहीर झालेल्या परीक्षांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत आहे. राज्यातील लाखो उमेदवार आयोगाच्या विविध परीक्षांची तयारी करतात. यासाठी शहराच्या ठिकाणी हजारो रुपये खर्च करून अनेक वर्षे अभ्यास करतात. मात्र, राज्य सरकार आणि आयोगाच्या अशा ढिसाळपणामुळे स्पर्धा परीक्षार्थींचे नुकसान होत असल्याची ओरड होती. अखेर आयोगाने हरपाळकर यांची सचिवपदी निवड केली आहे.
महेंद्र हरपाळकर हे सहसचिव पदावर पदोन्नतीने कार्यरत होते. त्यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय निकड लक्षात घेता, त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर आयोगाच्या सचिवपदी वर्णी लागली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या सेवाकाळाची गणना केली जाईल.
आयोगाचे निकाल वेळेवर न लागल्यामुळे पुढील नियोजन करता येत नाही. सचिव पद रिक्त असल्यामुळे अनेक निकाल रखडले होते. आता नवीन सचिव आल्याने किमान निकालाच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि प्रलंबित निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.
- एक विद्यार्थी
आमच्यासारखे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात येऊन राहतात. क्लासेस, अभ्यास साहित्य, घरभाडे यासाठी दरमहा मोठा खर्च होतो. परीक्षा होऊन अनेक महिने उलटूनही निकाल लागत नाही, मुलाखतींच्या तारखा ठरत नाहीत, यामुळे मानसिक ताण वाढतो. आता परीक्षेच्या वेळापत्रकात पारदर्शकता आणि वेग येईल.
- एक विद्यार्थी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.