

Pune News : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र, यंदा राज्याचे चित्र अत्यंत वेगळे आणि धक्कादायक पाहायला मिळत आहे. उपलब्ध जागांच्या तुलनेत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड घटल्याने 'प्रवेशाचा महापूर पण विद्यार्थ्यांचा दुष्काळ' अशी स्थिती निर्माण झाली आहे. या विसंगतीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रामुख्याने खालील पाच प्रश्न ऐरणीवर आले आहेत:
गेल्या वर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील ९ हजार ५३५ महाविद्यालयांमध्ये कॅपअंतर्गत १८ लाख १५ हजार १६५ आणि कोटा प्रवेशासाठी ३ लाख ४४ हजार ६७ अशा मिळून तब्बल २१ लाख ५९ हजार २३२ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी १४ लाख ७९ हजार ६५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला, तर जवळपास ९ लाख जागा रिक्त राहिल्या होत्या.
मात्र, यंदा परिस्थिती अधिक चिंताजनक दिसत आहे. राज्यातील ९ हजार ५८४ महाविद्यालयांमध्ये यंदा २१ लाख ९२ हजार ३६ जागा उपलब्ध असतानाही केवळ ८ लाख २६ हजार १७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे उपलब्ध जागांच्या तुलनेत अवघ्या ३० टक्केच नोंदणी झाली असून, तब्बल ७० टक्के जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्जच केले नसल्याचे समोर आले आहे.
राज्यात २१ लाखांहून अधिक जागा उपलब्ध असताना केवळ ८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी का केली? गेल्या वर्षीच्या तुलनेत ही घट मोठी आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालये सोडली तर इतर महाविद्यालयांमधील शिक्षण आणि सोयीसुविधांवर विद्यार्थ्यांचा विश्वास उरला नाही का, असा प्रश्न पालक विचारत आहेत.
पारंपारिक अकरावी-बारावी करण्याऐवजी विद्यार्थी आता थेट डिप्लोमा (पॉलिटेक्निक), आयटीआय किंवा इतर कौशल्य आधारित कोर्सेसकडे वळत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अकरावीला ७० टक्के जागांसाठी नोंदणीच न होणे, हा मोठ्या बदलाचा संकेत मानला जात आहे.
जेव्हा ७० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती असते, तेव्हा अनेक खासगी विनाअनुदानित महाविद्यालये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शुल्कात सवलत देणार का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. प्रवेशाचा टक्का वाढवण्यासाठी महाविद्यालये आता कोणते 'गिमिक्स' वापरणार, याचीही चर्चा आहे.
शिक्षण विभागाने शून्य आणि पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी, विद्यार्थ्यांची संख्याच कमी असल्याने या फेऱ्या पूर्ण होणार का? नोंदणी वाढवण्यासाठी शिक्षण विभाग मुदतवाढ देणार की रिक्त जागांसह प्रक्रिया पुढे नेणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये साशंकता आहे.
ज्या महाविद्यालयांत अत्यल्प नोंदणी झाली आहे, अशा तुकड्या बंद होणार का? तसे झाल्यास तिथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणार नाही ना, ही धास्ती पालकांना सतावत आहे.
एकूणच, १० एप्रिलपासून नोंदणी सुरू होऊनही महिनाभरात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षण विभागाची झोप उडाली आहे. आता २१ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या पहिल्या फेरीनंतर या गोंधळाचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.