

Pune News: गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडसह इतरही काही महापालिकांच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्याचसाठी अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात होते. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) युती फिस्कटली असल्याची माहिती समोर येत आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी(ता.26) पार पडली.या बैठकीत घड्याळ की तुतारी या चिन्हांवर तोडगा न निघाल्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य युती जवळपास फिस्कटल्यातच जमा झाली आहे.
अजित पवार (Ajit Pawar) हे घड्याळ चिन्हासाठी आग्रही होते.मात्र, शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या उमेदवारांसाठी तुतारी चिन्हावर ठाम असल्याची माहिती आहे.या चिन्हांवरून दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या पक्षाला 35 जागांचा प्रस्ताव देण्यात आला. उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असाही आग्रह करण्यात आला.यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर येत आहे.
आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तत्काळ आपला प्लॅन बदलला असून महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावत चर्चाही सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या सगळ्या वेगवान घडामोडींनंतर पुण्याच्या महापालिका निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. वरिष्ठ स्तरावरून त्याला मान्यताही देण्यात आली होती. त्यानंतर चिन्हाबाबत एकमत न झाल्यानं मात्र ही युती फिस्कटल्याची माहिती आहे. आता शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. त्यानंतर पत्रकरांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र यावी, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे त्याबाबतच्या अनेक मुद्द्यावर उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही दोघेजणही निष्कर्षपर्यंत पोहचलो आहोत. त्यामुळे आता येत्या काळात जिथे शक्य असेल त्या ठिकणी एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.