
Pune News : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणादरम्यान अजितदादांच्या काही विधानांमुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला.
निवेदिकेने लोकमान्य टिळकांचं त्यांच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवार मंडळीतील नाव दादा होतं. त्यांना अनेक लोक दादा म्हणत, असे सांगितले. पुढे आज आपल्या व्यासपीठावरही दोन दादा आहेत. एक अजितदादा आणि दुसरे रोहितदादा, असे निवेदिके म्हणताच रोहित टिळक यांनी शेजारीच बसलेल्या चंद्रकांतदादांकडे हात दाखवत मी नाही त्यांचे नाव घेण्याचा इशारा केला. त्यानंतर मग निवेदिकेने चंदकांतदादांचा उल्लेख केला.
अजितदादांनी आपल्या भाषणात त्याचा संदर्भ देत निवेदिका पुण्याच्याच आहेत का, असा सवाल केला आणि म्हणाले, ‘त्या दोन दादा म्हणाल्या. चंद्रकांतदादांना अजून आमचे पुणेकर कोल्हापूरचेच समजतात. ते पुण्याचे वाटतच नाहीत. त्यात जरा तुम्ही लक्ष घाला देवेंद्रजी. तुम्ही सगळीकडे लक्ष घालता आणि इथेच लक्ष घालत नाही.’
अजितदादांच्या या विधानावर लगेच फडणवीसांनीही ‘तुम्ही त्यांना पालकमंत्री होऊ दिले नाही म्हणून’, असे उत्तर दिले. अजितदादा एवढ्यावर थांबले नाहीत. माझ्याआधी ते पालकमंत्री होते, अशी आठवण फडणवीसांना करून दिली. तसेच तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं, तुला पुण्याचा पालकमंत्री करणार आहे, म्हणून मी आलो, असे अजितदादा म्हणताच त्यांच्यासह सभागृहातील प्रत्येकाचा हसू आवरले नाही.
अनेक खासदार गडकरींकडे विविध कामांकडे जात असल्याचे सांगताना अजित पवार म्हणाले, अनेकजण त्यांच्याकडे जातात, नाष्ट्याची वेळ असेल तर नाष्टा करतात, जेवणाची वेळ असेल तर जेवण करता. आपल्या पुणेकरांसारखे नाही. गंमतीचा भाग जाऊद्या, मला पुण्यात राहायचंय. पण पुणेकरांसारखा माणूस देशात, जगात मिळणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी अजितदादांनी केल्यानंतर सभागृहात हशा पिकला.
भाषणादरम्यान अजित पवारांनी गडकरींचे कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले, गडकरी यांनी पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन समाजकारणावर लक्ष केंद्रीत केले आहे. कोणत्याही मदतीचे काम करताना प्रसिध्दी मागायची नाही, राजकारण करायचा नाही, हा सल्ला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहे. महाराष्ट्राच्या मातीतील माणूस म्हणून त्यांचे बोलणे, वागणे कितीही थेट असले तरी त्यामागे संवेदशनशीलता असते. विकासकामांबाबत त्यांचे बारकाईने लक्ष असते.
देशाचा गाडा सांभाळत असताना महाराष्ट्रही तितकाच पुढे गेला पाहिजे ही त्यांची भावना असते. या खात्याचे मंत्री गडकरी झाल्यापासून सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. ते आणि मी नेहमी समोरासमोर म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी अशा भूमिके राहिलो आहे. मात्र, गडकरींच्या वागण्यात कधीही अहंकारीपणा आक्रस्ताळेपणा नव्हता. परस्पर सन्मान होता. त्यामुळेच वैचारिक भिन्नता असून आम्ही स्नेह आणि आपुलकी जपल्याचे अजितदादांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.