

Balbharati News: बालभारतीची पुस्तके खरेदी करताना आता पालक आणि विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून काही इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे जुनी पुस्तके खरेदी केल्यास पुढच्या वर्षी ती उपयोगाची राहणार नाहीत, असे बालभारतीने स्पष्ट केले आहे.
बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जून 2026 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. त्यामुळे या वर्गांच्या विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकेच खरेदी करावीत.
इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीची सध्याची पुस्तके 2026-27 हे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यामुळे या वर्गांची पुस्तके आवश्यकतेनुसारच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
यासोबतच इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीची प्रात्यक्षिक नोंदवही वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. खासगी प्रकाशकांच्या नोंदवहीची सक्ती शाळांना करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बालभारतीने विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांवर 40 टक्के सवलत जाहीर केली असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
इयत्ता 2 री, 3 री, 4 थी आणि 6 वीची नवीन पुस्तके जून 2026 पासून येणार
या वर्गांसाठी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकेच खरेदी करण्याचे आवाहन
इयत्ता 5 वी, 7 वी, 9 वी आणि 11 वीची सध्याची पुस्तके शेवटच्या वर्षात
जुनी पुस्तके आवश्यकतेनुसारच खरेदी करण्याच्या सूचना
9 वी ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी बालभारतीची प्रात्यक्षिक नोंदवही बंधनकारक
शाळांना खासगी प्रकाशकांच्या नोंदवहीची सक्ती करता येणार नाही
इंग्रजी माध्यमासाठी ‘शिकू मराठी आनंदे’ पुस्तक उपलब्ध होणार
इतर माध्यमांसाठी ‘करू मैत्री मराठीशी’ हे पुस्तक दिले जाणार
स्वाध्याय पुस्तिकांवर 40% सवलत जाहीर
विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करावा, असे आवाहन बालभारतीकडून करण्यात आले आहे