Pune News, 28 Dec : "शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी २५ उमेदवारांची प्रभागनिहाय यादी मंत्री उदय सामंत यांना दिली. त्या यादीनुसार शिवसेनेला जागा देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील व विजय शिवतारे यांच्यामध्ये चर्चा झाली असून याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होईल, असे पाटील यांनी जाहीर केले आहे.
त्यानुसार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे याबाबत अंतिम निर्णय घेतील व शिवसेना २५ जागांवर ठाम आहे," अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. मात्र, शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर नीलम गोऱ्हेंनी युटर्न घेतल्याचं दिसत आहे.
कारण दोनच दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हेंनी भाजपके केवळ १५ जागांची मागणी केल्याता दावा काही शिवसैनिकांनी केली होता. शिवाय यावर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट गोऱ्हे यांच्या मॉडेल कॉलनीतील घरासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. तुम्ही फक्त भाजपने सांगितलेलेच ऐकण्याचे काम शिवसेनेचे नेते करत आहात.
तुम्ही भाजपकडे फक्त १५ जागाच कशा मागितल्या? तुम्ही शिवसेनेला ताकद देताय की खच्चीकरण करत आहात? भाजपच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार आहे का?’ असे सवाल या आंदोलक शिवसैनिकांनी उपस्थित केले होते. शिवाय जे कार्यकर्ते ५ वर्ष काम करत आहेत त्यांना डावललं जातंय. आम्ही दिलेला कामाचा अहवाल बघितला जात नाही.
ज्या भागामध्ये नीलम गोऱ्हे राहतात, त्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक झालेला नाही. त्यांनी या भागात शिवसेना वाढू दिली नाही. गोऱ्हे आणि शिवसेनेच्या पुण्यातील नेत्यांनी निवडणुकीची तिकिटे कमर्शिअल पद्धतीने द्यायचं ठरवले आहे का? असा आरोपही यावेळी इच्छुक शिवसैनिकांना केला होता.
मात्र, हे सर्व आरोप नीलम गोऱ्हे यांनी फेटाळले होते. ‘शिवसेना कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना चुकीची माहिती मिळाली असून भाजपकडे २५ पेक्षा अधिक जागांची मागणी केली आहे. तसेच उमेदवारीचे तिकीट वाटपाचा निर्णय कुणी एक व्यक्ती घेत नसून शहरातील कोअर कमिटीतील नेते तिकीट वाटपाचा निर्णय घेतात, असं त्यांनी सांगितलं होतं.
अशातच आता शिवसेना २५ जागांवर ठाम असून याबाबत उदय सामंत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा झाल्याचं नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्या म्हणाल्या, ‘‘भाजपने देऊ केलेल्या १५ जागा शिवसेनेला मान्य नाहीत. आमची प्रभागनिहाय यादीबाबत बैठक झाली आहे. विजय शिवतारे, रवींद्र धंगेकर, अजय भोसले, आबा बागूल हे यावेळी उपस्थित होते.
याबाबत पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेतील. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयानुसार १६५ पैकी आम्हाला सरासरी ४७ जागा मिळणे अपेक्षित होते पण आम्ही २५ जागा मागितल्या असून, त्या तरी भाजपने देणे आवश्यक आहे. महापालिका निवडणुकीत सन्मानजनक युती व्हावी, ही शिवसैनिकांची अपेक्षा आहे. अंतिम निर्णय अल्पावधीत होईल,’’ अशीही अपेक्षा गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.