
अनेक दिवसांची चर्चा, विरोध असतानाही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पवार ) प्रवेश झाला. इंदापुरातील बाजार समितीच्या मैदानात झालेल्या पाटलांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीतील निष्ठावंत आणि संभाव्य तीन बड्या नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच, नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आला. मात्र, तो निष्फळ ठरला. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनीही सुप्रिया सुळे यांच्याकडे एक विनंती केली आहे.
राष्ट्रवादीतील लोकांनी आम्हाला सांभाळून घ्यावं, असं हर्षवर्धन पाटील ( Harshavardhan Patil ) यांनी सुप्रिया सुळे यांना म्हटलं आहे. एकप्रकारे नाराजांची मनधरणी करावी, अशी विनंती पाटील यांनी सुळेंकडे केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे नाराजांची मनधरणी कशी करतात? कसा मार्ग काढतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाटील काय म्हणाले?
हर्षवर्धन पाटील म्हणाले, "आम्ही कधी द्वेष करत नाही. आपण आलो आहे, सगळे एकत्र काम करू. माझी सुप्रिया ताई ( Supriya Sule ) तुम्हाला विनंती आहे, तुमच्या लोकांनी आम्हाला सांभाळून घ्यावं. त्यामुळे आम्हाला काही अडचण येणार नाही. शेवटी आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे."
"शरद पवार आणि आमचे व्यक्तीगत, कौटुंबिक संबंध चांगले आहेत. मात्र, शरद पवार कधी आमच्याबद्दल काही बोलले नाहीत, आम्हीही शरद पवार यांच्याबाबत बोललो नाही. आमचं दुखणं वेगळं होतं. ते आता बाजूला गेलं आहे. त्यामुळे आता कसलाही त्रास कुणालाही होणार नाही," असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
इंदापुरातील नाराज नेते कोण?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( शरदचंद्र पवार ) आप्पासाहेब जगदाळे, सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने, भरत शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला होता. त्यासाठी या प्रमुख नेत्यांनी बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झाला. या प्रवेशाला इंदापुरातील संभाव्य उमेदवार आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा यांनी गैरहजेरी लावली. पाटील यांच्या प्रवेशापूर्वी सुप्रिया सुळे यांनी तीनही नेत्यांशी चर्चा केल्याचं बोललं जातं. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे हे तीन बडे नेते कोणता निर्णय घेणार? सुप्रिया सुळे तीनही नेत्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार होणार का? हे पाहावं लागणार आहे.
समजूत काढण्याची जबाबदारी माझी...
"जो कुणी संघर्षाच्या काळात राहिला, त्याला एकालाही नाराजीची भावना कधीही येऊ देणार नाही. जो कुणी नाराज असेल, त्याची समजूत काढण्याची जबाबदारी माझी असेन," असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.