Akola News: मराठवाड्यातील बीडमध्ये ज्याप्रमाणे गुन्हेगारी उफाळून आली आहे.तसाच अनुभव आता शांत,सुरक्षित आणि विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात येऊ लागला आहे. याला अपवाद खाकी वर्दीतील पोलिस नसल्याचं काही घटनांनी दाखवून दिलं आहे. याचदरम्यान, आता महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यानं पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत धक्कादायक दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) सोमवारी(ता.6)विदर्भातील अकोला येथे मीडियाशी संवाद साधताना थेट गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या पुणे शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांवर थेट मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील गुन्हेगारीच्या पाठीशी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी आमच्या या आरोपाला आता काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकरांनी गौतमी पाटील प्रकरणात केलेल्या आरोपांनी पुष्टी मिळाली असल्याचंही सपकाळ सांगितलं.
सपकाळ म्हणाले, पुण्याच्या ससूनमध्ये ड्रग्ज विकणाऱ्याला कोणी मदत केली? हे महाराष्ट्रासमोर उघड आहे. पुण्यामधील वाढती गुन्हेगारी आणि कोयता गँगच्या पाठीमागे कोणता 'दादा' आहे? हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर करावं.पुण्यातील गुन्हेगारीला भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जबाबदार आहे,या आमच्या आरोपावर धंगेकरांच्या आरोपांमुळे शिक्कामोर्तब झाल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी एकनाथ शिंदेंचं मोठेपण होऊ नये,म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाचा शिधा योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप करत महायुतीत वादाची ठिणगी टाकली.यावेळी त्यांनी आनंदाचा शिधा योजनेनंतर लाडकी बहीण योजनाही बंद करणार असल्याचं विधानही केलं.
अकोल्यात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आगामी काळात होत असलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीवर थेट भाष्य केलं. ते म्हणाले,राहुल गांधींच्या बिहारमधील जनता यात्रेला अलोट प्रतिसाद मिळत आहे.राहुल गांधींनी दिलेला 'वोट चोर,गद्दी छोड'हा नारा बिहारच्या निवडणुकीत प्रभावीपणे काम करणार असून तिथे मोठं जनआंदोलन उभं राहण्याचा दावाही त्यांनी केला आहे. बिहार निवडणुकीत भाजपला पळता भुई थोडी होईल असंही सपकाळ म्हणाले.
काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून गायब झाले होते. अखेर त्यांनी शनिवारी(ता.4) सध्या पुण्यात गाजत असलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील कार अपघात प्रकरणात एन्ट्री घेतली.यावेळी त्यांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे करत असताना त्यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती देखील जोरदार निशाणा साधला होता.
शिवसेना नेते धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांनी मोबाईलमधून व्हिडिओ रेकॉर्ड करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथं पोलीस स्टेशनला येऊन बोललं पाहिजे होत अशी टीका त्यांनी केली होती. तसेच मोबाईलमध्ये व्हिडिओ करून फक्त दाखवून काही साध्य होत नाही. त्याच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत. त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे. गौतमी पाटील हिने जी चूक केली आहे, ते त्यांनी तिथे येऊन बोललं पाहिजे. ऑफिसमधून व्हिडिओ करून काही उपयोग नाही ते खोटं काम असल्याचा आरोप करत चंद्रकांतदादांना टोला लगावला होता.
चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे. तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो. तुझ्याकडे जे काही मोबाईल नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केलं पाहिजे. गुंड निलेश घायवळ आणि तो कितीवेळा बोलून दादांना निरोप दिला, याची पोलिसांनी माहिती घ्यावी. सत्ता आहे म्हणून पोलीस काहीही करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज ठरवलं तर घायवळ नेस्तनाबूत होईल. मात्र. ज्यांनी ही पिलावळ वाढवली त्यांचा तपास केला पाहिजे, अशी टीका धंगेकर यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.