Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित विजयी मेळावा 5 जुलैला मुंबई होणार आहे. या मेळाव्यामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा लेबल नसेल, असे ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मेळाव्याला राज्यातील इतर पक्षांतील कोणते नेते उपस्थित राहणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यामध्ये विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विजयी मेळाव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काल मला भेटले त्यांनी सांगितलं की, जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये आपण सहभागी होणार आहोत. त्यामुळे पक्षांच्या अध्यक्षांचा आदेश मी मानतो, असे पवारांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता खुद्द पवार या मेळाव्यात जाणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
वारीमध्ये शहरी नक्षलवाद घुसला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, वारीतील घुसखोरीबाबत काल दोन संस्थांची नावे बाहेर आली आहेत. त्यातील लोकायत ही एक संस्था आहे. ती संस्था अनेक चांगली काम करते. ती नक्षली नाही. मात्र नक्षली शिक्के मारण्याचं काम केलं जात असून यापूर्वी देखील अशाच प्रकारे काही लोकांना अनेक वर्षे तुरुंगात टाकण्यात आलं होतं, अशी टीका शरद पवार यांनी केली.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. यावर शरद पवार म्हणाले, याबाबत काही लोक मला भेटले त्यांनी महात्मा फुले यांचे नाव त्या रेल्वे स्थानकाला द्यावं असं काहींनी सुचवलं. तसंच काहींनी छत्रपती संभाजीराजे यांचे देखील नाव सुचवलं आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव ज्यांनी सुचवलं त्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असेल, तसेच कदाचित त्यांना आदेश आला असेल, असा खोचक टोला देखील शरद पवार यांनी लगावला.
सरकारने शक्तीपीठ महामार्ग बनवण्याचं काम हाती घेतलं आहे. मात्र महामार्गाला शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध होताना पाहायला मिळत आहे. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे बेळगावला जायला चांगला रस्ता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांगले रस्ते तयार केले आहेत. मध्ये मध्ये कामामुळे काही ठिकाणी डायव्हर्जन आहे. परंतु सध्याचा रस्ता उत्तम आहे. असे असताना दुसरा रस्ता कशाला हवा, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री म्हणतायेत या रस्त्याची गरज आहे. एक रस्ता असताना दुसरा कशाला हवा आहे. हे आम्ही त्यांच्याकडून समजून घेऊ. मात्र केवळ रस्ता होत नसतो, त्यात अनेकांच्या जमीन जात असतात. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडून समजून घेऊ की दुसरा रस्ता का गरजेचा आहे, असे शरद पवार म्हणाले.
महायुतीच्या निवडणुकीतील कर्जमाफीच्या घोषणेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, कर्जमाफी बाबत सरकारची भूमिका ही योग्य वेळी निर्णय घेऊ एवढेच आहे. असं माझ्या वाचनात आला आहे. मी केंद्रीय कृषी मंत्री असताना माझ्या काळामध्ये 71 हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात देशाच्या इतिहासात कधीही कर्जमाफी झाली नव्हती. ती आम्ही करून दाखवली आम्ही बोलत बसलो नाही, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणीस यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.