Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी छोट्या मोठ्या कारणावरून मतभेद सुरु आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वातावरण चांगलेच तापलेले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मंचर येथे नागरिक सत्कार समारंभ पार पडला. यावेळी कार्यक्रमात थोडा गोंधळ झाला होता.
या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या मेळाव्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शेवाळवाडी- गोरक्षनाथ टेकडी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी झाला. यावेळी ठाकरे गटाचे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांनी मेळाव्याप्रसंगी ठाकरे शिवसेना पक्षाच्या मुळावर येणाऱ्यावर घाव घालू, असा इशारा दिला. (Shivsena News)
उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षाच्या मुळावर जे आत्तापर्यंत आले किंवा जे येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मुळावर घाव घातल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांनी दिला. शेवाळवाडी- गोरक्षनाथ टेकडी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचे काम आमच्याकडून होणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मानून महाविकास आघाडी ठरवेल, त्या उमेदवाराचे काम नक्कीच प्रभावीपणे करू. यापुढील काळात होणारा अपमानही आम्ही सहन करणार नाही. जुन्या लोकांचा आदर करा. पक्ष संघटना बांधणीसाठी गावोगावी मेळावे व बैठकांचे आयोजन केले जाईल, युवक व युवतींचा सहभाग पक्षात वाढविला जाईल, असेही भोर यांनी स्पष्ट केले.uda
ज्यांना पंधरा वर्षे शिवसेनेने (Shivsena) खासदार करून नेते केले. त्यांनीच या भागात आमचा पक्ष संपवण्याचे केलेले काम दुर्दैवी आहे, असाच प्रकार जर यापुढे कोणी करणारा असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही. नागरी सत्कार प्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भावी आमदार देवदत्त निकम असा उल्लेख केला. त्यामुळे आनंदावर विरजण पडले, असे संघटक राजाराम बाणखेले यांनी स्पष्ट केले.
संघटक बाणखेले यांनी देवदत्त निकम यांचे नाव न घेता टीका केली. अनेक गावात निकम यांना कार्यकर्ते मिळाले नाहीत, म्हणून त्यांनी त्यांच्या गावाच्या आसपास राहणाऱ्या कार्यकर्त्यांना पदे दिली. राज्यातील धोकेबाज सरकार आपल्याला पायउतार करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीसाठी एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खंडागळे, सुरेखा निघोट, दत्ता गांजाळे, दिलीप पवळे, भरत मोरे, संदीप शिंदे यांची भाषणे झाली. अनिल निघोट यांनी आभार मानले. यावेळी राजाराम बाणखेले, जुन्नर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर खंडागळे, ज्येष्ठ नेते संभाजीराव तांबे, अभियंता गणपतराव घोडेकर, विकास जाधव, कलावती पोटकुले, नितीन भालेराव, अरुण बाणखेले, हेमंत एरंडे, नितीन चासकर उपस्थित होते.