Lok Sabha Election News : राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार पहिल्यांदा 1995 साली आले होते. त्या यशात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल हा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होता. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा 'मातोश्री'वरून घेतला जात होता. त्यासोबतच केंद्रातील भाजप सरकारमध्ये शिवसेनाचा मोठा वाटा राहत होता.
त्यामुळे त्याकाळापासून 'मातोश्री'चा दरारा कायम आहे. पुढे उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेची सत्ता राज्यात 2014 व 2019 मधील सत्तेतील सहभाग यामुळे त्यांनी ही सत्ताकेंद्र 'मातोश्री'वरूनच संभाळली जात होती.
गेल्या दोन वर्षाच्या काळात शिवसेनेत (Shivsena) पडलेली उभी फूट त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यामुळे जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यांनी मुखमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 40 आमदार, 13 खासदार, नगरसेवक सोडून गेल्याने त्यांच्याकडे केवळ 15 आमदार व 5 खासदार उरले होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिले नसल्याच्या वावड्या उठवल्या होत्या.
त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कामाचा झपाटा दाखवून दिला. आजारी असतांनाही त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले. त्यांनी सोबत महाविकास आघाडीला हाताशी धरत लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवला. तीन महिन्यात प्रचाराची सूत्रे हातात घेत सभा गाजवल्या. त्यांच्या सभेला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याचवेळी राज्यात महाविकास आघाडी (MVA) बाजी मारणार हे दिसत होते.
निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद सत्यात उतरला आणि महाविकास आघाडीने मोठी बाजी मारली. या विजयाचे शिल्पकार उद्धव ठाकरे ठरले. राज्यात काँग्रेसला 13, शिवसेना ठाकरे गटाला 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाला 8 जागा अशा महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच खासदारांनी विजयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आनंदोत्सव साजरा केला. निकाल लागल्यापासून गेल्या आठ दिवसापासून निवडून आलेल्या खासदारापासून ते सर्वच पक्षाच्या दिगग्ज नेत्यांनी मातोश्रीवर रांग लावत, मातोश्रीचा दरारा आजही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
राज्यात महाविकास आघाडीने यश मिळवल्यानंतर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीने मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ह्यावेळी कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार, मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार अस्लम शेख उपस्थित होते.
दुसरीकडे केंद्रातील इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, खासदार डेरेक ओब्रायन यांनी उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली.
शिवसेना ठाकरे गटाचे यवतमाळ-वाशिमचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, मुंबईतील खासदार अनिल देसाई (Anil Desai), संजय दिना पाटील, अरविंद सावंत यांनी भेट घेतली.
काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबईच्या खासदार प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) त्यासोबतच काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री सतेज पाटील यांनी भेट घेतली. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे, रत्नागिरीचे उमेदवार विनायक राऊत, रायगडचे उमेदवार अनंत गीते, शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी भेट घेत पराभवाच्या कारणांवर चर्चा केली.
त्यानंतर मंगळवारी अमरावती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी 'मातोश्री'वर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांचे अभिनंदन करीत तोंडभरून कौतुक केले. यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि इतर कॉंग्रेस नेते-पदाधिकारी उपस्थित होते.