

पुणे : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) मार्फत राबवण्यात येणारे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण तब्बल ९ महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आदिवासी समाजातील हजारो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. TRTI मधील प्रशासकीय अनागोंदी व निष्क्रियतेमुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. TRTI नं नुकतीच ८२ विद्यार्थी पोलीस भरती झाल्याची माहिती दिली पण हे विद्यार्थी २०२४-२५च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. पण शैक्षणिक वर्ष २०२५-२६ हे संपत आलं तरी ही बॅच अद्याप सुरुच झालेली नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे महासचिव ॲड. कृष्णा सुभाष साठे यांनी केला आहे.
पोलिस भरतीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे पूर्व प्रशिक्षण पूर्णपणे ठप्प झाले आहे. परीक्षा साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये पार पडूनही आजपर्यंत निकाल जाहीर करण्यात आलेला नाही, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी TRTI कडे जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७८ हजार अर्ज वैध ठरले. मात्र, केवळ १८ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी ही संख्या २३ हजार होती. निधीअभावी विद्यार्थ्यांची संख्या 5 हजारांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारच्या धोरणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण विलंबामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक व शारीरिक तयारी पूर्णपणे खंडित झाली आहे. हजारो विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले असून, त्यांच्या उमेदीच्या काळातील एक महत्त्वाचे वर्ष अक्षरशः वाया गेले आहे.
हे प्रशिक्षण साधारणतः ६ महिन्यांचे असताना, सध्याच्या विलंबामुळे एप्रिल २०२६ पर्यंत केवळ प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. परिणामी, २०२५-२६ च्या बॅचचे प्रशिक्षण डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल, जे प्रत्यक्षात जून २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. यामुळे पुढील २०२५-२७ बॅचची प्रक्रिया केव्हा सुरू होणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
2025-26 साठीच्या प्रशिक्षण प्रक्रियेत इतका मोठा विलंब का झाला?
निकाल जाहीर करण्यासाठी ४ महिन्यांहून अधिक कालावधी का लागत आहे?
निकाल केव्हा जाहीर होणार व त्यानंतरची संस्था निवड प्रक्रिया कधी राबवली जाणार?
कागदपत्र पडताळणी नेमकी केव्हा पूर्ण होणार? तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या बॅचेस कधी सुरू होणार, याबाबत स्पष्टता का दिली जात नाही?
दरम्यान, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी एनएसयूआय महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने टीआरटीआय आयुक्त मंजिरी मनोलकर यांच्याकडे करण्यात आली आहे. यामध्ये, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण तात्काळ सुरू करण्यात यावे, निकाल त्वरित जाहीर करून संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, विद्यार्थ्यांच्या संख्येत केलेली कपात रद्द करून पूर्वीप्रमाणे संधी द्यावी, संपूर्ण वेळापत्रक पारदर्शकपणे जाहीर करावे ह्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
“टीआरटीआय' मधील प्रशासकीय अनागोंदीमुळे आदिवासी समाजातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अक्षरशः अंधारात आले. ९ महिन्यांपासून प्रशिक्षण बंद ठेवणे आणि निकाल जाहीर करण्यात झालेला विलंब हा केवळ निष्काळजीपणा नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांवर सरळ अन्याय आहे. जर पुढील ७ दिवसांच्या निकाल जाहीर होऊन प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला नाही, तर एनएसयूआय तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ॲड. कृष्णा साठे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.