
BJP News : तब्बल 127 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी भाजपचे नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर अडचणीत आले आहेत. यशवंत नागरी सहकारी बँकेच्या 140 कोटींच्या कर्जांपैकी तब्बल 127 कोटींचे कर्ज बनावट संस्थांच्या नावावर उचलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांच्यावर यापूर्वीच गुन्हाही दाखल आहे. आता सीबीआय चौकशीचा ससेमिराही त्यांच्यामागे लागण्याची शक्यता आहे.
पण भाजप नेत्याच्या मागे हा ससेमिरा मागे लागावा म्हणून खुद्द भाजपच्याच खासदार मेधा कुलकर्णी मैदानात उतरल्या आहेत. ठेवीदार संघटनेचे अॅड. नीलेश जाधव हे चरेगावकर आणि बँकेची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेटही घेतली. याच भेटीसाठी मेधा कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला होता. तसेच भेटीसाठीही आल्या होत्या. त्या केवळ भेट घडवूनच थांबल्या नाहीत. तर कराडमध्ये जाऊन त्यांनी बैठक घेत ठेवीदारांचे गाऱ्हाणेही ऐकून घेतले.
राजकीय वलयाचा फायदा घेत सामान्य ठेवीदारांना फसविणाऱ्या यशवंत सहकारी बँकेच्या विरोधात लढा उभारला आहे. ठेवीदार आणि काही कर्जदारांच्या तक्रारींची पोलिसांकडून दखलच घेतली जात नाही. त्यामुळे प्रशासक नियुक्त करून बँकेच्या कारभाराची सीबीआय चौकशी व्हावी. बोगस सहीने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज प्रकरणांसह पैशांची अफरातफर करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी कुलकर्णी यांनी केली.
याशिवाय तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या कारभाराचीही चौकशी करावी, यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्या सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी होणार असून, त्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहे, असे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले आहे. त्यामुळे चरेगावकर यांना आता तुरुंगात पाठवून आणि ठेवीदारांना न्या देऊनच कुलकर्णी शांत बसणार असे दिसते.
विठ्ठल कुलकर्णी, शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर व तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर या बंधूंनी बनावट कंपन्या स्थापन केल्या. त्याद्वारे 125 कोटी रुपयांची बेनामी कर्ज प्रकरणे मंजूर झाली. या कर्जांना कोणतेही पुरेसे तारण घेतलेले नाही. कोणत्याही नियमांचे पालन केले नाही. घाईघाईने कर्जाचे वाटप केले. त्याच्या रकमा कर्जदारांच्या कर्ज खात्यावरून त्यांच्या बनावट कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्या. ऑडिट रिपोर्टमध्ये त्या बाबी अनियमितता दर्शवूनही यंत्रणांनीही त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
यवतमाळ अर्बन बँक,चिखली अर्बन बँक-बुलढाणा, वाई अर्बन बँक, वारणा सहकारी बँक, कांचन गौरी पतसंस्था-डोंबिवली, समता पतसंस्था-कोपरगाव, सरस्वती महिला पतसंस्था-पुणे यांच्यासह आणखीही काही संस्थांकडून खोटी कर्ज घेतली आहेत. त्यामुळे त्या संस्थांही अडचणीत आल्या आहेत. या कर्ज प्रकरणांचा वापर करून दापोली तालुक्यातील बुरुंडी येथे चरेगावकरांनी जमीन खरेदी केली. त्यासह इंदापूर, करमाळा, खेड शिवापूर, भिगवण, विंग आणि कऱ्हाडच्या रुक्मिणीनगर येथीलही स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.