Mumbai News : राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे पक्ष फोडण्यासाठी त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार करण्यासाठी ईडीचा वापर करण्यात आल्याचा आरोप नेहमीच विरोधकांकडून केला जातो. त्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाला. यामागेही ईडीच असल्याचे आरोप झाले होते.
आतापर्यंत ज्यांच्यावर ईडीच्या कारवाईचे संकट होते ते शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री रवींद्र वायकर (Ravindra Waykar), आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav), माजी खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर (Amol kirtikar), भाजपचे नेते कृपाशंकर सिंह (Krupashnkar Sinh) यांना लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले जात आहे. त्याशिवाय काही जणांवर ईडी कारवाईची टांगती तलवार असलेल्यांचे जवळचे नातलग लोकसभेसाठी नशीब अजमावणार आहेत. (Lok Sabha Election News)
महाविकास आघाडीचे सरकार पाडून काही जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होणे पसंत केले होते. या आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने अनेक खासदार व आमदारांवर ईडीची चौकशी पुढे झाली नाही. त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबईमधून शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आयकर विभागाने कथित करचोरी प्रकरणात यामिनी जाधव यांचे पती व शिवसेना नेते आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या 5 कोटी रुपयांच्या फ्लॅटसह 41 मालमत्ता जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये भायखळ्यातील बिलखडी चेंबर बिल्डिंगमधील 31 फ्लॅट, वांद्रे येथील 5 कोटी रुपयांचे फ्लॅट आणि भायखळ्यातील हॉटेल क्राउन इम्पीरियलचा समावेश आहे. मात्र, शिंदे गटासोबत यशवंत जाधव यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढे त्यांची चौकशी झालेली नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामधून माजी मंत्री रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रविंद्र वायकर यांची कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणात ईडीची चौकशी सुरू आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता त्यांना लोकसभेचं तिकिट मिळाले आहे. तर त्यांच्या विरोधात नशीब अजमावत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यावर कोविड-19 दरम्यान परप्रांतीयांना खिचडी वाटपात झालेल्या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी सुरु असताना त्यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे.
कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. सिंह उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता आणि काडतूस सापडल्याचे आरोप आहेत.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील माढ्यातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ईडीने प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित ‘टॉप्स सेक्युरिटी ग्रुप’शी संबंधित ही कारवाई केली होती. सरनाईक ठाण्यातून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून राज्यातील तब्बल 21 नेत्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती. पण कारवाईच्या भीतीने अनेकांनी आरोप झाल्यानंतर यातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या प्रकरणाची पुढे चौकशी झाली नाही. यावेळी राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग व रत्नागिरीतून लोकसभा लढवत आहेत तर माजी मंत्री विजयकुमार गावित यांना नोटीस पाठवली होती मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चौकशी थांबली. त्यांच्या कन्या हिना गावित नंदुरबारमध्ये उमेदवार आहेत.
दरम्यान, राज्यातील प्रमुख नेत्यांसह अनेक आमदार व खासदारांना ईडीची नोटीस प्राप्त झाली होती. त्यानंतर यामधील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील काही मंडळींना नोटीस प्राप्त होताच गुपचूप भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राज्यातील भाजपच्या एकाही नेतेमंडळीवर कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून केल्या जात असलेल्या आरोपात तथ्य असल्याची चर्चा जोरात आहे.