
Nagpur ZP : राजकारणात बंडाची भाषा केल्याशिवाय किंवा उपद्रव मूल्य दाखवल्याशिवाय पदरी काही पडत नाही असे म्हणतात. एका अर्थाने ते खरेच आहे. नागपूर जिल्हा परिषदेत घडलेल्या घडामोडींवर हे याचा सर्वांनाच प्रत्यय आला. विश्वास बसणार नाही, परंतु नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशा सावरकर या भाजप आमदाराच्या गाडीतून उतरून अक्षरश: पळून गेल्या होत्या. शेवटी अध्यक्षपद देऊनच भाजपला त्यांची समजूत काढावी लागली होती.
2012 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होती. युतीकडे काठावरचे बहुमत होते. वेळेवर कोणी गडबड करू नये म्हणून भाजपने आपल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना मध्यप्रदेशातील अमरकंटक येथे पर्यटनाला नेले होते. मतदानाच्या दिवशी सर्वांना आणण्याचे नियोजन केले होते. त्यावेळी अध्यक्षपद महिला राखील होते. भाजपच्यावतीने संध्या गोतमारे आणि निशा सावरकर ही दोन नावे आघाडीवर होती.
सर्व जिल्हा परिषद सदस्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नागपूरमध्ये परत आणले जात होते. यादरम्यान निशा सावरकर यांना त्यांचा पत्ता कापल्याची बातमी समजली. अस्वस्थ झालेल्या निशा सावरकर तत्कालीन आमदार अशोक मानकर यांच्या गाडीत बसल्या. नागपूर शहरात एंट्री करताच ‘इमर्जंसी‘ चा बहाणा करून त्या गाडीतून उतरल्या आणि पळ काढला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
दुसरीकडे काँग्रेसनेही अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती. निशा सावरकर काँग्रेसच्या गटात जाणार अशी अफवा पसरली. त्यामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. भाजपने ‘प्लॅन बी‘वर काम सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांंच्याशी भाजपने तडजोड केली. त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद देऊन भाजपने डॅमेज कंट्रोल केले.
भाजपच्या संध्या गोतमारे अध्यक्ष झाल्या आणि राष्ट्रवादीचे चंद्रशेखर चिखले उपाध्यक्ष झाले. यात निशा सावरकरांचे प्रयत्न मात्र फसले. पण त्यांची चतुराई त्यांना अडीच वर्षानंतर कामात आली. झाले गेले विसरून भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशा सावरकर यांना भाजपमध्ये आणले आणि अध्यक्षपदही दिले. अशारितीने निशा सावरकर अध्यक्ष झाल्या. विशेष म्हणजे त्या अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक एक वर्ष लांबली. त्यामुळे त्यांना अडीच नव्हे तर तब्बल साडेतीन वर्ष जिल्हा परिषदेचा कार्यकाळ उपभोगता आला.
निशा सावरकर यांच्यासोबत पती टेकचंद सावरकर यांचेही नशीब फळफळले. विधानसभा निवडणुकीत भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापून सर्वांनाच धक्का दिला होता. त्यावेळी बावनकुळे यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली. ते निवडूनसुद्धा आले. मात्र पाच वर्षानंतर बावनकुळे यांनी पुन्हा आपला कामठी विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.