

Rajiv Satav wife: राहुल गांधींसाठी एका मिनिटात खासदारकी सोडणारे राजीव सातव आणि आता त्याच राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसचा निरोप घेतल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. हा निर्णय अचानक वाटत असला, तरी त्यामागे गेल्या दहा वर्षांचा राजकीय प्रवास, पक्षातील बदलते समीकरण आणि सातव कुटुंबाची भूमिका यांचा मोठा संदर्भ आहे.
2014 मध्ये राजीव सातव यांनी हिंगोलीतून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. देशभरात मोदी लाटेत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. मात्र महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांच्यासह राजीव सातव हे मोजकेच नेते विजयी झाले. त्या काळात काँग्रेसला देशपातळीवर मोठा धक्का बसला होता आणि संघटन मजबूत करण्याची गरज निर्माण झाली होती.
2017 ची गुजरात विधानसभा निवडणूक हे काँग्रेससाठी मोठे आव्हान होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान असतानाची ही पहिलीच गुजरात निवडणूक होती आणि भाजप गेली दोन दशके सत्तेत होता. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून गुजरातमधील सौराष्ट्र भागाची जबाबदारी राजीव सातव यांच्यावर सोपवण्यात आली. युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मिळालेला अनुभव त्यांनी प्रभावीपणे वापरला. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला कडवी टक्कर दिली आणि सर्वाधिक जागा सौराष्ट्रातून मिळवल्या.
यानंतर सातव यांच्याकडे संपूर्ण गुजरातचे प्रभारीपद देण्यात आले. त्या काळात पक्षात अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात होते. राजीव सातव यांनी हे मतभेद शांत केले आणि हार्दिक पटेल यांना काँग्रेससोबत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पटेल समाजाचा पाठिंबा मिळाल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली. 2017 मधील ही रणनीती 2022 च्या निवडणुकीत नसल्याची उणीव काँग्रेसला प्रकर्षाने जाणवली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतही राजीव सातव यांची भूमिका चर्चेत राहिली. विद्यमान खासदार असूनही त्यांनी हिंगोलीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि राहुल गांधींसोबत देशभर प्रचार करण्याची जबाबदारी स्वीकारली. राहुल गांधी यांनीच एकदा सांगितले होते की, मी निवडणूक लढवणार नाही, तुमच्यासोबत प्रचार करेन, असे म्हणत सातव यांनी एका मिनिटात उमेदवारी सोडली होती.
निवडणुकीनंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभेत पाठवले. मात्र अवघ्या वर्षभरातच कोरोनाकाळात आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतरही राहुल गांधी आणि सातव कुटुंबातील संबंध कायम राहिले. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी हिंगोलीतील सातव यांच्या घरी गेले होते. प्रज्ञा सातव यांना प्रचंड विरोध असतानाही दोनदा विधान परिषदेत संधी देण्यात आली. मात्र आता त्यांनी काँग्रेसपासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.