
गुजरातच्या अहमदाबादेतून लंडनसाठी उड्डाण भरल्यानंतर दोन मिनिटांतच प्रवासी विमान कोसळले आणि देशासह जगही हळहळले. विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला. विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या होस्टेलवर कोसळले तेथून 24 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या होस्टेलमध्ये भरल्या ताटावर अनेक डॉक्टरांनी प्राण सोडले. या विमानाचा अपघात कशामुळे झाला, यावर आता चर्चा सुरू झाली आहे, विविध अंदाज बांधले जात आहेत. विमान अपघाताची कारणे आणि शंकांनी आभाळ व्यापून टाकले आहे, समाजमन हादरून गेले आहे.
एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर ( एआय 171) हे विमान अहमदाबादेतून लंडनला निघाले होते. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही प्रवास करत होते. मृतांमध्ये त्यांचाही समावेश आहे. या अपघातानंतर विमानांची देखभाल दुरुस्ती, उड्डाणाच्या आधी केली जाणारी तपासणी याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गृहराज्यात ही भयंकर दुर्घटना झाली आहे. या अपघातानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानाबात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा अपघात शहरात विमान कमी उंचीवर असताना झाला आहे. त्यामुळे एखादा पक्षी धडकला असावा, अशी शंका तज्ञांनी व्यक्त केली आहे. धावपट्टीवर ठरावीक ताकद न घेता विमानाने उड्डाण केले असावे, हेही कारण सांगितले जात आहे. विमानाच्या पंखांजवळील फ्लॅपचा विस्तार निर्धार मानकांनुसार नाही झाला तर नोज डीप अपघाताला कारणीभूत ठरू शकते, अशी मते तज्ञांनी व्यक्त केली आहेत. विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर लँडिंग गियर बंद झाले नव्हते, असे समोर आले आहे. विमानाच्या नोजमध्ये अधिक रोटेशन झाले, इंधनाचा दबाव होता, अशी कारणेही दिली जात आहेत.
विमानाच्या ब्लॅक बॉटक्समधून खरे काय ते कारण समोर येऊ शकते. राज ठाकरे यांच्यानुसार, ड्रीमलायनर विमानाबाबत अनेक तक्रारी होत्या, असे असतानाही डीजीसीएने दखल का घेतली नाही, कारवाई का केली नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. याबाबतच पुरावेही त्यांनी दिले आहेत. विमानाच्या तंत्रज्ञानाबद्दल मला खूप खोल माहिती नाही, पण माझ्या वाचनात काही बाबी आल्या, त्यातूनच मला काही प्रश्न पडले आहेत. बोईंगच्या या ड्रीमलायनर विमानाबद्दल अनेक तक्रारी होत्या. जपान एअरलाइन्सच्या या विमानाला 2013 मध्ये पहिल्यांदा आग लागली होती, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
वाढत्या तक्रारींमुळे 2020 ते 2023 दरम्यान अनेकवेळा या विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जानेवारी 2013 मध्ये अमेरिका, युरोपमधील जवळपास सर्वच मोठ्या विमान कंपन्यांनी बोईंड ड्रीमलायनरची उड्डाणे बंद केली होती. भारतात 2013 मध्ये डीजीसीएने काही कालावधीसाठी उड्डाण बंद केले होते. या सर्व बाबी जगभरातील माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या विमानाबाबत जगभरात तक्रारी असतानाच्या काळात म्हणजे जानेवारी 2014 मध्ये एअर इंडियाच्या ताफ्यात ते कसे दाखल झाले, असा कळीचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. इतक्या तक्रारी असतील, उड्डाणावर अनेकवेळा बंदी घातलेली असेल तर या विमानांचा वापर का केला गेला, असा प्रश्न आता नागरिकांनाही पडला आहे.
बोईंग ड्रीमलायनरबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्या तरी ते कोसळण्याची ही पहिलीच दुर्घटना आहे. 14 वर्षांपूर्वी लॉँच झालेल्या या मॉडेलचे काही आठवड्यांपूर्वीच उत्पादक कंपनीने कौतुक केले होते. अहमदाबाद दुर्घटनेमुळे बोईंग कंपनीला मोठा धक्का बसला आहे. जगभरात 1175 पेक्षा अधिक ड्रीमलायनरनी 5 लाख उड्डाणांचा टप्पा गाठला आहे. 30 दशलक्षहून अधिक उड्डाण तासांचा प्रवास या विमानांनी पूर्ण केला आहे, असे बोईंग कंपनीने नुकतेच सांगितले होते. न थांबता प्रवास करण्यासाठी हे विमान ओळखले जाते. त्यामुळे नॉनस्टॉप फ्लाइटसाठी त्यांचा वापर केला जातो.
विमान प्रवासी वाढणे हे प्रगतीचे लक्षण समजले जाते. मात्र अशा दुर्घटना घडल्या की नागरिकांच्या मनात शंका निर्माण होतात. पैसा, श्रीमंती असली तरी सुरक्षेचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. हा अपघात आहे की घातपात, अशीही चर्चा समाजमाध्यमांत ओघानेच सुरू झाली आहे, मात्र या चर्चेला ठोस असा आधार दिसत नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती बाहेर येत आहे आणि ती मन सुन्न करून टाकणारी आहे. ब्लॅक बॉक्समधून अपघाताचे नेमके कारण समोर येईपर्यंत अंदाज, शंका आणि कारणांनी आभाळ व्यापलेलेच राहणार आहे.