
Changing Narratives Post Party Shift : ज्या घराने मोठेपण दिले, मान-सन्मान, पदे दिली, ते जुने घर सोडून नव्या घरात प्रवेश केला, इथपर्यंत ठीक होते. मात्र नवीन घरात जाताच जुन्या घराला दूषणे देण्याची जणू 'फॅशन'च सध्या रूढ झाली आहे. नावे ठेवणारे, दूषणे देणारे आज ज्या उंचीवर आहेत, ते त्या जुन्या घरामुळेच. जुन्या घरात असताना केलेले नको ते उद्योग निस्तारण्यासाठी किंवा नवीन घरात आपले वजन वाढावे, वरिष्ठ मंडळी आपल्यावर खूश राहावीत, यासाठी असा खटाटोप राज्यातील काही नेत्यांकडून केला जात आहे. नव्या घरातून मिळालेले 'टास्क' पूर्ण करताना हे नेते स्वतःच आपल्या वडिलांच्या आणि स्वतःच्याही कर्तृत्वाचा अपमान करत आहेत.
यात सर्वात मोठे नाव आहे ते अशोक चव्हाण यांचे. अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री. एकदा नव्हे, तर दोनदा त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केले. आदर्श घोटाळ्यात नाव आल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. नंतर त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणूनही काँग्रेसने संधी दिली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग हे मलईदार समजले जाणारे खाते त्यांना मिळाले होते. काँग्रेसच्या उमेदवारीवर ते लोकसभेतही पोहोचले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. एखाद्या पक्षाने एखाद्या नेत्याला यापेक्षा अधिक आणखी काय द्यायचे असते?
इतक्या साऱ्या संधी मिळूनही अशोक चव्हाण यांनी मैलाचा दगड ठरेल, असे एखादे काम केले का, हा महत्वाचा प्रश्न आहे. गेल्यावर्षी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्या काही दिवस आधीच लोकसभेत काँग्रेसच्या काळातील कथित घोटाळ्यांची चर्चा झाली, एक यादीही आली होती. त्यात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. त्यानंतर काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन अशोक चव्हाण भाजपवासी झाले आणि अगदी तीन-चार दिवसांतच त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. आता ते काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. काँग्रेसच्या काळात विकासाची गती कमी होती; मोदींच्या काळात ही गती दुपटीने वाढली, असे ते म्हणत आहेत.
अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांचे नाव आदराने घेतले जाते. निष्कलंक राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी कामांचा धडाका लावला होता. महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ अशीही शंकरराव चव्हाण यांची ओळख आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणजे जायकवाडी धरण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे असलेल्या या धरणाची उभारणी शंकरराव चव्हाण यांनी केली आहे. या धरणाची साठवणक्षमता 102 टीएमसी आहे. मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांतील 2.40 लाख हेक्टर जमीन या धरणामुळे ओलिताखाली आली आहे. हे धरण भरले तर शेतीसाठी दोन वर्षे आणि पिण्यासाठीच्या चार वर्षांच्या पाण्याची चिंता मिटते.
शंकररावांनी पाटबांधारे मंत्री असताना जायकवाडी धरणासह विष्णुपुरी, इसापूर, मनार, येलदरी, सिद्धेश्वर, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा आदी प्रकल्पांची उभारणी केली. कंत्राटदार लोक शंकररावांच्या जवळपासही फिरकत नसत. शंकररावांनी भ्रष्टाचाराला थाराच दिला नव्हता, हे त्याचे कारण होते. त्यांना राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते, असेही म्हटले जाते. इतकी वर्षे मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपदावर राहूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. ही कामे शंकररावांनी काँग्रेसमध्येच राहून केली, याचा विसर त्यांचे पुत्र, भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना पडला आहे. काँग्रेसला नावे ठेवत असताना आपण स्वतःचा, आपल्या वडिलांचा अपमान करत आहोत, हे त्यांना कळत नसेल का?
अभयसिंहराजे भोसले हेही राज्याच्या राजकारणात आदराने घेतले जाणारे नाव. त्यांचे पुत्र शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सध्या महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. ठराविक अंतराने शिवेंद्रसिंहराजे हेही काँग्रेसवर टीका करत असतात. काँग्रेसने अभयसिंहराजेंचा नेहमीच सन्मान केला होता, हे शिवेंद्रसिंहराजे यांनाही मान्य आहे. अभयसिंहराजे हे 1999 मध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नसते तर काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव पुढे केले असते. अभयसिंहराजे हे विलासराव देशमुख यांच्यापेक्षा सिनियर होते, त्यांच्यावर कोणताही आरोप नव्हता, असेही शिवेंद्रसिंहराजे गेल्यावर्षी म्हणाले होते.
शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आणि सार्वजिनक बांधकाम मंत्री बनले. अभयसिंहराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डावलण्यात आले, असे सांगत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यासोबतच काँग्रेसमध्ये अभियसिंहराजेंना मानाचे स्थान होते, हे अप्रत्यक्षपणे मान्य केले होते. आता शिवेंद्रसिंहराजे काँग्रेसवर टीका करत आहेत. अभ्यसिंहराजे यांची राजकीय जडणघडण काँग्रेसच्या विचारसरणीत झाली होती. काँग्रेस सरकारच्या काळात दर महिन्याला एक घोटाळा बाहेर येत होता. गेल्या 11 वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारवर घोटाळ्याचा एकही आरोप झालेला नाही, असे ते म्हणत आहेत. या सरकारांवर घोटाळ्यांचे अनेक आरोप झाले आहेत, काँग्रेसचे कथित घोटाळेबाज भाजपमध्ये आले आहेत, याचा मात्र त्यांना विसर पडला आहे,
या यादीत राधाकृष्ण विखे पाटील यांचेही नाव घ्यावे लागले. विखे पाटलांना काँग्रेसने भरभरून दिले आहे. त्यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील हेही काँग्रेसमध्ये होते. त्यांचीही जडणघडण काँग्रेसमध्येच झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांचीही कारकीर्द काँग्रेसमध्ये सुरू झाली. काँग्रेसच्या सरकारांमध्ये त्यांना विविध मंत्रिपदे मिळाली. विरोधी पक्षनेतेपदही मिळाले. विरोधी पक्षनेते असतानाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कोण कोणत्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा निर्णय असू शकतो. मात्र मूळ पक्षावर टीका, आरोप करून हे नेते स्वतःसह वडिलांच्या कर्तृत्वावरही पाणी फेरत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.