
Bihar Politics : बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव त्यास कारणीभूत ठरले आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या 12 वर्षांपासूनच्या रिलेशनशिपबाबत सोशल मीडियातून जाहीर खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर लालुंचे कुटुंब चक्रव्युहात अडकले आहे.
बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपसमोर लालूंच्याच पक्षात सर्वात मोठे आव्हान आहे. पण तेजप्रताप यादव यांच्यामुळे लालू प्रसाद यादव व त्यांचा पक्ष काहीसा बॅकफूटवर गेल्याचे मानले जात आहे. एकीकडे राजकीय लढाई आणि दुसरीकडे कौटुंबिक कलह यामध्ये त्यांची कोंडी झाली असून त्यातून सहजासहजी बाहेर पडणे सोपे नाही.
विविध घोटाळ्यांमध्ये आधीच लालूंचे कुटुंब अडकले आहे. चारा घोटाळ्यात त्यांना स्वत:ला शिक्षा झाली आहे. सध्या ते वैद्यकीय जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत. तर रेल्वे टेंडर घोटाळ्यात त्यांच्यासह पत्नी राबडी देवी, पुत्र व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, कन्या मीसा भारती यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच कायद्याच्या कचाट्यात आले आहे.
दुसरीकडे तेजप्रताप यांची पहिली पत्नी ऐश्वर्या राय यांच्यामध्ये घटस्फोटाची न्यायालयीन लढाई सुरू आहे. 2018 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. सहा महिन्यांतच ऐश्वर्या यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयात धाव घेतली. त्यांनी राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. अद्याप हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.
तेजप्रताप यादव यांचे प्रेमप्रकरण बाहेर आल्यानंतर लालूंच्या कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. लालूंनी त्यांची कुटुंबासह पक्षातून हकालपट्टी केली आहे. तेजप्रताप यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. पण ते शांत बसणारे नाहीत. ते नवा पक्ष स्थापन करून आरजेडीला थेट आव्हान देऊ शकतात. तसे संकेतही मिळत आहेत. त्यांची एक युवकांची संघटना आहे. त्यामाध्यमातून त्यांनी राज्यभर आपले प्रस्थ निर्माण केले आहे.
तेजप्रताप यांना पक्षासह कुटुंबातून बेदखल करत लालूंनी पायावर दगड पाडून घेतल्याचे मानले जात आहे. कुटुंबासह पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी घरातील सदस्यावरच कारवाई करत एक सूचक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याचा सकारात्मक परिणामही होईल. पण विरोधकही शांत बसणार नाहीत. त्यांनी तेजप्रताप यांच्या पहिल्या पत्नीचा मुद्दा बाहेर काढला आहे. संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी ऐश्वर्या यांच्यावर झालेल्या अन्यायावर लालू गप्प का आहेत, असा सवाल करत तसे संकेत दिले आहेत.
तेजप्रताप यादव हे अनुष्का यादव या तरूणीसोबत 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एवढी वर्षे लालूंच्या कुटुंबाला त्याची काहीच माहिती नाही, असे होऊ शकत नाही. 2018 मध्ये ऐश्वर्या यांच्यासोबत विवाह करताना तेजप्रताप यांनी आपल्या रिलेशनशिपबाबत माहिती दिली नसेल का, की राजकीय फायद्यासाठी त्यांनीही त्यावेळी वडिलांचे ऐकत मनाविरोधात लग्न केले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे ठाकले आहेत.
तेजप्रताप आणि अनुष्का यांच्या विवाहाचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तसे झाले असल्यास ते कायदेशीर कचाट्या अडकू शकतात. लालूंच्या संपूर्ण कुटुंबालाच त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेजप्रताप यांची लव्हस्टोरी आता बिहारच्या राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.