Pune News : शिवसेनेचे खासदार (ठाकरे गट) संजय राऊत हे सरकार कधी पडेल याची तारीख दररोज सकाळी देत असतात. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आरडाओरड करत असतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भीतभीत काहीतरी बोलत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील हे थोर मुत्सदी असल्यासारखे बोलत असतात, पण हे सर्वजण आता कुठे आहेत? शिक्षकभरती कधी होणार, असा प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणीला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी थेट धमकावले आहे.
खासदार सुप्रिया सुळे वगळता एकाही नेत्याने केसरकर यांच्या या कृतीचा निषेध केला नाही. राऊत, वडेट्टीवार, पटोले, चव्हाण फक्त आपल्याच सोयीच्या राजकीय मुद्द्यांवर आवाज उठवणार आहेत का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राजकारणाच्या माध्यमातून आपल्या अनेक पिढ्यांची सोय करून ठेवणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना सामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत जिव्हाळा असतो, या भ्रमातून लोकांनी बाहेर पडावे, अशी घटना नुकतीच घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीआयपी कल्चर मोडीत काढण्याचा संकल्प केलेला असताना राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्याला नोकरभरती कधी होणार, हा एका तरुणीचा प्रश्न बेशिस्त वर्तनासारखा वाटला. त्यांनी त्या तरुणीला नोकरीसाठी अपात्र करण्याची धमकी दिली. (Mahavikas Aaghadi News)
आपल्या राजकीय सोयीच्या मुद्द्यांवर आवाज उठवणारे विरोधी पक्षातील नेते नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शांतच राहिले. याला अपवाद ठरल्या फक्त खासदार सुप्रिया सुळे. त्यांनी केसरकरांचे कान उपटले. या सरकारला सत्तेची, पैशांची मस्ती चढली आहे. त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपतींच्या भूमीत हे सरकार शिक्षकांचा अपमान करत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार सुळे वगळता केसरकरांच्या या कृत्याविरोधात एकही आवाज उठला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काही वर्षांपासून राजकारणाचे मुद्दे बदलत आहेत. लोकांच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न बाजूला पडले आहेत. भावनिक, धार्मिक मुद्द्यांनी त्यांची जागा घेतली आहे. लोकांना भुलवत ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याकडे सर्वच राजकीय पक्षांचा कल वाढला आहे. मात्र, मूळ मुद्दे विसरण्याचे सोंग राजकीय पक्षांना आणि लोकांनाही फार दिवस घेता येणार नाही. दैनंदिन समस्यांकडे कधी ना कधी वळावेच लागते. लोक जागे व्हायला लागले की राजकीय नेत्यांची अडचण होते. अशीच अडचण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची काही दिवसांपूर्वी झाल्याचे दिसून आले.
लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. मात्र, नको त्या मुद्द्यांना भुलल्याची किंमत लोकांनाही मोजावी लागत आहे. अशा परिस्थितीत कुणी प्रश्न विचारला की सत्ताधाऱ्यांच्या, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, तळपायाची आग मस्तकाला जाते. राजकीय नेत्यांना आपल्या ग्राउंडवर न आणता त्यांच्या ग्राउंडवर जाऊन खेळणाऱ्या नागरिकांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतो.
आरोग्य, शिक्षण, शांतता, अर्थव्यवस्था मजबूत असणे हे सुदृढ समाजाची गरज असते. मात्र, स्थिती नेमकी उलट आहे. देश, राज्यात बेरोजगारीच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. शिक्षण घेऊनही तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सतत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना अपवाद वगळता अशा मुद्द्यांशी काहीही देणेघणे नसते, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. शिक्षक भरती कधी होणार, असा प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणीला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी थेट धमकी दिली.
लोक जागे होणे, हे आपल्याला परवडणारे नाही, हे केसरकर यांच्या लक्षात आले असावे. प्रश्नाचे उत्तर देणे तर दूरच राहिले, त्यांनी त्या तरुणीलाच नोकरभरतीसाठी अपात्र करण्याची धमकी दिली. हे सर्व होत असताना विरोधक शांत राहिले. सरकारवर ऊठसूठ टीका करणारे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांतील नेते केसरकर यांच्या या कृत्यावर मूग गिळून गप्प बसले आहेत.
राज्यात शिक्षकांच्या जवळपास १८ हजार जागा रिक्त आहेत. त्या गेल्या पाच वर्षांपासून भरल्या गेलेल्या नाहीत. राज्यात शिक्षक भरतीवर २०११ मध्ये बंदी घालण्यात आली होती. ती २०१९ मध्ये उठवण्यात आली. बंदी उठवून पाच वर्षे झाली तरी शिक्षकांची भरती सुरू करण्यात आलेली नाही. कार्तिक पौर्णिमेनिमित्त बीडच्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे मन्मथ स्वामी यांच्या समाधीची शासकीय महापूजा दीपक केसरकर (Deepak Kesarkar), कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली.
त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना एका भावी शिक्षिकेने शिक्षक भरतीविषयी केसरकरांना प्रश्न विचारला. गेल्या पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र, शिक्षक भरती रखडल्यामुळे आमच्यासारख्या टीईटी पात्र उमेदवारांची निराशा झाली आहे. भरती नेमकी कधी होणार, असा प्रश्न त्या तरुणीने विचारला होता. हा प्रश्न केसरकरांना बेशिस्त वाटला आणि त्यांनी त्या तरुणीला अपात्र करण्याची धमकी दिली.
केसरकरांचे हे वर्तन लोकशाही राज्यात अपेक्षित नाही. मूळ मुद्द्यांपासून भरकटत जाऊन नको त्या विषयांवर नागरिकांचा सरकारला पाठिंबा मिळू लागला, की यापेक्षा वेगळे काहीही होणार नाही. आपल्याच राजकीय सोयीच्या मुद्द्यांवर सरकारवर घणाघाती टीका करणाऱ्या विरोधी पक्षात असणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना याचे काहीच वाटले नाही, हे धक्कादायक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनाही केसरकरांना समज द्यावी, असे वाटले नाही. सर्वच राजकीय पक्ष आणि नेते आपल्या सोयीचे राजकारण करत असतात, याची जाणीव लोकांना वेळीच व्हायला हवी, अन्यथा कामाचा प्रश्न विचारला की राजकीय नेते लोकांना धमक्या द्यायला सुरू करतील.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.