.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी, महायुतीतील नेते सर्व पातळीवर एकत्र राहण्याचे आवाहन करत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता आणि प्रस्थापित नेत्यांमध्ये निर्माण झालेला अविश्वास यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीविषयी उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष संपवण्याच्या उद्देशाने महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. त्याचा फटका येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्रपक्षांना बसणार आहे. महायुतीच्या मित्रपक्षाचे नेतेच एकमेकाविरोधात स्थनिकच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकणार असल्याने येत्या काळात मतांचे गणित बिघडणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील मित्रपक्षात इनकमिंग वाढले आहे. विशेषतः महायुतीमधील भाजप, शिवसेना (Shivsena) शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात एकमेकाच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविलेलेया नेत्यांनी प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेली मंडळी आता महायुतीच्या मित्रपक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे आता एका म्यानात दोन तलवारी बसवायच्या कशा? असा प्रश्न महायुतीला पडला आहे. त्यामुळे जागोजागी ताकद वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत असले तरी उद्या हे चित्र महायुतीसाठी ओझेच ठरण्याची शक्यता आहे.
भाजपचा (Bjp) महायुतीतील तीन पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येतील त्याप्रमाणात पक्ष प्रवेशाचे सोहळे वाढणार आहेत. या तीन पक्षांना वाटते की, या प्रवेशामुळे येत्या काळात आपल्या पक्षाचे भांडवल वाढेल. पण, प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर महायुतीमध्ये भांडण लागण्यासाठी इनकमिंगवाले जबाबदार असणार आहेत, त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष असणार आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील आमदार आहेत. त्यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकताच अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे या ठिकणी या दोघांमध्ये लढत होणार आहे. दुसरीकडे पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये किशोर पाटील हे शिंदे सेनेचे आमदार आहेत. त्यांचे कट्टर विरोधक व माजी आमदार दिलीप वाघ यांनी शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे याठिकाणी वाघ विरोधात पाटील असा संघर्ष पाहवयास मिळणार आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या राधानगरी मतदारसंघात माजी आमदार के. टी. पाटील निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात होते. त्यांनतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आता परवा अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी पुन्हा एकदा या निमित्ताने आबिटकर व के. टी. पाटील यांच्यातील संघर्ष उफाळून येणार आहे.
चार दिवसापासुर्वीच अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कट्टर विरोधक असलेले माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये आता कल्याणशेट्टी विरुद्ध म्हेत्रे अशी सरळ लढत पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे याठिकाणी मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिंदे शिवसेनेत संघर्ष पाहावयास मिळणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात एका तरी ठिकाणी अशाप्रकारचा संघर्ष महायुतीमधील मित्रपक्षात पहावयास मिळणार आहे. त्यामुळेच महायुतीमधील तीनही पक्ष विरोधक शिल्लक ठेवायचा नाही, या उद्देशातून फोडाफोडी करीत असले तरी येत्या काळात हा सर्व प्रकार महायुतीच्या दृष्टीने घातक ठरणार आहे. त्यामुळेच महायुतीमध्ये होत असेलली ही इनकमिंगमुळे येत्या काळात स्थानिकच्या निवडणूककीसाठी महायुतीतच रणधुमाळी पेटणार आहे. हे मित्रपक्षच जर या निमित्ताने आमने-सामने आल्यास मतांचे गणित मात्र बिघडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.