भावाचे कौतुक करायचे नाही, असे राज ठाकरेंनी ठरवलेले दिसते : जयंत पाटलांचा खोचक टोला

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची राज यांच्यावर टीका
Jayant Patil-Raj Thackeray
Jayant Patil-Raj Thackeraysarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध नाहीत. पण नर्मविनोदी शैलीत टोमणे मारण्यात जयंतरावांचा हात कोणी धरू शकत नाही. त्याचे प्रत्यंतर आज राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा दिसून आले.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेविषयी विचारले असता त्या सभेला आम्ही परवानगी दिलेली आहे. कोणाच्याही भाषण स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे सरकारचे धोरण नसल्याचे सांगितले.

Jayant Patil-Raj Thackeray
'राज ठाकरेंचे योगी आणि भोगींसंदर्भात मनपरिवर्तन कसं झालं?'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदिवरील भोंग्यांवर कारवाई केल्याबद्दल राज ठाकरे यांनी कौतुक केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यावर जयंत पाटील यांनी ठेवणीतील अस्त्र काढले. ``मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मागे गुजरातचे कौतुक केले. आता ते युपीचे कौतुक करत आहेत. महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांचे कौतुक करण्यासाठी राज ठाकरे दौरे करतील. जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलेले दिसते, अशी खोचक टीका त्यांनी केली.

भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजप-राष्ट्रवादीच्या युतीचे 2017 मध्ये ठरल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर विचारले असता मी चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. आशिष शेलार म्हणतात त्याप्रमाणे चर्चा झाल्याचे मला तरी वाटत नाही. आमची काँग्रेसबरोबर त्यावेळी आघाडी होती. आम्ही भाजपसोबत जायचे काय कारण होते? उलट त्याकाळात भाजप व शिवसेनेची सत्ता असतानाही भाजपला आमच्याशी चर्चा का करावीशी वाटली, असा माझ्यावतीने तुम्ही आशिष शेलार यांना विचारा असे जयंत पाटलांनी पत्रकारांना सांगितले.

Jayant Patil-Raj Thackeray
..तर राज ठाकरेंची सभाच बंद पाडणार! भीम आर्मीचा थेट इशारा

भाजप-मनसेच्या युतीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सकारात्मक असल्याच्या चर्चेबाबत प्रश्न विचारला असता मा. जयंत पाटील म्हणाले की, संघ ही अराजकीय संघटना आहे. त्यांचा राजकारणाशी संबंध नाही. अशा चर्चांमध्ये संघाचे नाव आणून भाजपची मंडळी संघालाच बदनाम करत आहेत. मनसेबरोबर भाजपने युती केल्यास मुंबईतील उत्तर भारतीय लोक लांब जातील, याची माहिती भाजपला आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीची चर्चा संघाकडून सुरु झाली असल्याचे चित्र मुद्दामहून निर्माण केले जात आहे, असे ते म्हणाले.

भारतात महागाई प्रचंड वाढलेली आहे. अशावेळी विविध विषयांकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. आपल्या शेजारी असलेल्या श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये देखील महागाई वाढलेली दिसते. मात्र आपल्याकडे केंद्र सरकार महागाईचे खापर राज्यांवर फोडून मोकळे होत आहे. महागाईचे मूळ केंद्रातच आहे, हे विसरुन चालणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com