
Fund Allocation Despite Defeat Raises Eyebrows : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी देण्यात दुजाभाव केला जात असल्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांकडून केली जात होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतर युतीचे सरकार आले अन् तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते बोलून दाखवले. पण आता महायुती सरकारमध्ये तेच अजितदादा शिंदेंच्या माजी आमदाराला दरवर्षी 20 कोटी रुपये देत असल्याचा गौप्यस्फोट खुद्द या आमदारांनीच केला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईतील दादर-माहीम मतदारसंघाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी आपल्याला 20 कोटी मिळत असल्याची जाहीर कबुलीच दिली आहे. या कबुलीमध्ये राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. महायुती सरकारकडून विरोधी पक्षातील विद्यमान आमदारांना कमी निधी दिला जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. मात्र, आता सत्ताधारी पक्षांतील माजी आमदारांनाही निधीची खिरापत सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव सरवणकरांनीच मांडले आहे.
सरवणकर यांनी एकप्रकारे विरोधकांच्या आरोपांवरही शिक्कामोर्तब केले आहे. सरकारकडून सत्ताधारी नेत्यांना अशाप्रकारे पैशांचे मुक्त हस्ते वाटप केले जात असेल तर विरोधी पक्षातील आमदारांनाही हा निधी का मिळू नये, हा साधा सरळ प्रश्न आहे. त्यांच्या मतदारसंघातील जनतेलाही प्राथमिक सोयीसुविधा हव्या आहेत. या मतदारसंघातील हजारो लोकांनीही सत्ताधारी पक्षांतील पराभूत उमेदवारांना मतदान केले आहे. मग फक्त चेहरे बघून निधीचे वाटप का केले जात आहे, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.
सदा सरवणकर यांनी सरकारला उघडे पाडले आहे. मी आमदार नसतानाही माझी कामे सुरूच आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यामागे उभे आहेत. त्यामुळे मी पराभूत झालो, असे वाटत नाही, असेही 20 कोटींची कबुली देताना सरवणकर म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे विरोधक निश्चितच संतापणार. त्याप्रमाणे त्यांना पराभूत करणारे आमदार महेश सावंत यांनी त्यांच्यावर जोरदार प्रकार केला आहे. सरवणकर यांना जर दरवर्षी 20 कोटी रुपये मिळत असतील तर एवढा पैसा गेला कुठे, असा सवाल करत त्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली. मनसे नेते संदीप शिंदे यांनीही त्यावरून जोरदार निशाणा साधला आहे.
शिंदेंच्याच पक्षातील आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 3 कोटी रुपये आणि 100 बोकडांची तजवीज करावी लागत असल्याचे विधान करून आधीच खळबळ उडवून दिली आहे. स्थानिकची निवडणूक जिंकण्यासाठी एखादा उमेदवार लाखो रुपये खर्च करत असेल तर निवडून आल्यानंतर ते वसूल करण्याचीही तयारी हमखास तयारी असते. अर्थात त्याचे मार्ग वेगवेगळे असतात. पण पराभूत झाल्यानंतर काय? या प्रश्नाचे उत्तर सरवणकरांनी दिले आहे. पक्षातील नेत्यांचे हात अशा पराभूत उमेदवारांचे खांदे बळकट करतात. याच खांद्यांवरून मग पक्षाच्या बळकटीकरणाची पालखी वाहिली जाते.
जनतेच्या करातून मिळालेल्या पैशांमधून पक्षाचे नेते, पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षही मजबूत केला जातो. पण त्यांना निवडून देणाऱ्या जनतेच्या हाती काय लागते? तीच तीच आश्वासने, जुन्याच कामांचे नुतणीकरण अन् असंच बरंच काही. माजी आमदारांना आधीच सरकारकडून विविध सवलती दिल्या जातात. मग हा वरचा पैसा कुठून अन् कशासाठी दिला जातो, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. सरवणकर यांनी सांगितलेला 20 कोटींचा निधी अजितदादांच्या खात्याकडून मंजूर होऊन जातो की शिंदेंच्या खात्याकडून विविध कामांच्या निमित्ताने दिला जातो की थेट मुख्यमंत्र्यांच्या संमतीने या निधीचे सरवणकरांप्रमाणे इतर माजी आमदार, नेत्यांना वाटप होते, याचे गुढ सरवणकरच सांगू शकतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.