प्रकाश लिमये
MNS Politics : मराठी अस्मितेच्या मुद्यावरुन मिरा रोडमध्ये मराठी भाषिकांनी मंगळवारी (ता.8) भव्य मोर्चा आयोजित केला होता. यानिमित्ताने मिरा भाईंदरमध्ये अल्पसंख्याक असलेला मराठी माणूस एकवटला व त्याने शक्तीप्रदर्शन केले. अर्थातच यामुळे शहरतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.
मिरा रोडमध्ये एका मिठाई विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. त्याचे पडसाद व्यापारी वर्गात उमटले. व्यापार्यामम्ध्ये उमटलेल्या नाराजीला पडद्याआडून भाजपने देखील खतपाणी घातले. त्याचा परिणाम म्हणून व्यापार्यांनी मिरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला. मात्र या मोर्चाला पोलीसांनी परवानगी नाकारली होती. हा मोर्चा भाजप प्रणित होता असा थेट आरोप मनसेकडून करण्यात आला होता. या मोर्चाला राजकीय रंग आल्याने मनसेने देखील मोर्चा काढण्याचे घोषित केले. मात्र हा मोर्चा मराठी अस्मितेसाठी असून त्यात कोणताही राजकीय झेंडा वापरला जाणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले.
या मोर्चाला देखील पोलिसांनी परवानगी नाकारली. मोर्चा निघू नये म्हणून पोलिसांनी नेत्यांची व आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. मात्र पोलिसांची कारवाई झुगारून देत मोर्चा काढण्यात आला. त्यात शेकडोच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले. हा मोर्चा अराजकीय असल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात त्याला राजकीय वळण लागलेच.
मोर्चाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी परिवहनमंत्री व शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले मात्र आंदोलकांमधील काहींनी त्यांना रोखून धरले व त्यांच्या विरोधात राजकीय घोषणाबाजी केली. त्यामुळे सरनाईक यांना परत फिरावे लागले. या मोर्चात मनसेचे नेते अधिक ठळकपणे दिसून येत होते. मोर्चा चांगलाच यशस्वी झाल्याने त्याचे आगामी महापालिका निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून मोर्चाचा राजकीय लाभ नेमका कोणत्या पक्षाला मिळणार याचे आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे.
मिरा भाईंदरमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. दोन वर्षांपूर्वी मूदत संपलेल्या मिरा भाईंदर महनागरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. त्यापाठोपाठ शिवसेना व नंतर काँग्रेसचा क्रमांक होता. भाजपचा सर्वाधिक मतदार हा अमराठी म्हणजेच गुजराती, राजस्थानी, जैन व हिंदी भाषिक आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ हा मतदार भाजपच्या पाठिशी उभा आहे. तर मराठी मतदार शिवसेनेच्या पाठिशी आहे. त्यामुळे मराठी बहुल भागात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेस मुस्लिम बहुल परिसरावर एकहाती वर्चस्व राखून आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकसंध शिवसेनेतील बहुतांश पदाधिकारी व नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा रस्ता धरला. त्यामुळे मिरा-भाईंदरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद कमकुवत झाली आहे. असे असले तरी बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा बराचसा शिवसैनिक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे. त्याचे प्रत्यंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसून आले. दोन्ही निवडणुकीत बहुतांश मराठी मतदार मविआच्या पाठीशी उभा राहिला. असे असले तरी एकनाथ शिंदेंचे आमदार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मराठी मतदारही लक्षणीय आहे. या पार्श्वभुमीवर नुकत्याच झालेल्या मराठी मोर्चाचा राजकीय लाभ नेमका कोणाच्या पदरात पडतो याबाबत उत्सूकत लागून राहिली आहे.
मराठी मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांमध्ये भाजपबद्दल राग आहे व तो मोर्चाच्या वेळीही दिसून आला. मात्र आंदोलकांपैकी बहुतांश मतदार भाजपचे नाहीत. ते एकनाथ शिंदेंची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि काँग्रेसचे मतदार मानले जातात. त्यामुळे या आंदोलनाचा भाजपला थोड्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता असली तरी फार मोठी राजकीय उलथापालथ होईल असे चित्र नाही. या मोर्चात मनसेचा पुढाकार अधिक दिसून आला. त्यामुळे काही मतदार हे मनसेकडे अधिक प्रमाणात झकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फटका काही प्रमाणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसू शकतो. त्यासाठी आगामी निवडणुकांपर्यंत विरोधी पक्षांना मराठीचा मुद्दा तापत ठेवावा लागेल. मात्र स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन हे खमके नेतृत्व आहे. मात्र मनसेकडे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे त्या तुलनेत स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व दिसून येत नाही. उलटपक्षी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील प्रताप सरनाईक हे सर्वच बाबतीत वरचढ ठरतात. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपर्यंत मराठी आंदोलनाची धार कितपत टिकून राहते यावर येथील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.
मराठी अस्मितेसाठी मनसे व मराठी एकीकरण समितीकडून मंगळवारी (ता.८) मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी नेत्यांची तसेच आंदोलकांची धरपकड देखील केली. यावरून आंदोलकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी मोर्चाला परवानगी न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करत भाजपकडून 'डॅमेज कंट्रोल'साठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. पांडे यांच्या जागी निकेत कौशिक यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.