
Konkan Politics : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ऑपरेशन टायगर आणि भाजपच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना निम्म्यावर आली आहे. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचीही भर पडली असून ठाकरे गटातील महत्वाचे नेते पक्ष सोडत आहेत. रायगडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या विधानसभेच्या उमेदवार आणि भरत गोगावले यांच्या विरोधक असणाऱ्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. यानंतर रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी देखील शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अशा पद्धतीने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील ठाकरे गटाला मोठे धक्के बसले आहेत. पण आता उद्धव ठाकरेंनी कोकणाचा दौरा न केल्यास मूळ शिवसैनिकही भाजप, राष्ट्रवादीसह शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधीकाळी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जायचे. पण लोकसभापाठोपाठ विधानसभेमध्येही ठाकरे गटाला मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे हादरे तिन्ही जिल्ह्यात जाणवले. माजी आमदार, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांबरोबरच सरपंच आणि सदस्यांनीही ठाकरेंची शिवसेना सोडली आहे. महत्वाचे नेते शिंदेंच्या गोटात आणि भाजपमध्ये गेले आहेत. तर काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत.
पण महत्वाची बाब म्हणजे वरच्या फळीतील नेते, पदाधिकारी जरी दुसऱ्या पक्षात गेले असले तरीही तिसऱ्या-चौथ्या फळीतील चेहरे आजही ठाकरेंसाठी काम करताना दिसत आहेत. पण मातोश्रीवरून होणाऱ्या परस्पर नियुक्त्या, निष्ठावंतांना न मिळणारी संधी आणि इतर कारणांमुळे हे निष्ठावंत आता दुखावले असून ठाकरेंवर नाराज दिसत आहेत. आता यांची भेट घेवून समजूत न काढल्यास उरलेसुरले कार्यकर्तेही शिंदे गटासह अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर कोकणात सुरू आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात काही महत्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यावरही आता नाराजी समोर आली आहे. नुकसाच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले सहदेव बेटकर यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आल्यानेच निष्ठावंत शिवसैनिक दुखावला गेला आहे. येथे संपर्क प्रमुखपदावर सहदेव बेटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाप्रमुखपदी बाळाराम खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेटकर आणि खेडेकर यांच्या नियुक्तीसह दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी दत्ता कदम, उत्तर जिल्ह्यासह दापोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून मुजीब रूमाने, खेड तालुकाप्रमुख म्हणून दत्ताराम भिलारे, खेड शहर प्रमुख म्हणून चंद्रशेखर पाटणे, जितेंद्र दवंडे यांची मंडणगड तालुकाप्रमुख, रत्नागिरी दक्षिणसाठी जिल्हा समन्वयक म्हणून रवींद्र डोळस आणि प्रभारी तथा जिल्हा संघटक म्हणून संतोष खेराडे अशी नियुक्या करण्यात आल्या आहेत.
मात्र या जिल्हा कार्यकरणीला जिल्हा परिषद कडवईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आपले राजीनामे दिले आहेत. हे सर्व महायुतीतील मित्र पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. येथे ठाकरेंची ताकद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष हेराटे यांनी वाढवली आणि टिकवली होती. पण आता त्यांनीच निष्ठावांत कार्यकर्त्यांना डावल्याची भावना व्यक्त करत राजीनामा दिला आहे. यामुळे येथे ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन ठाकरेंना पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे आहेत. त्यामुळे होणाऱ्या डॅमेजकडे दुर्लक्ष करत संपर्क न केल्यास उरली सुरली शिवसेनाही कोकणात संपण्याची शक्यता आहे. तसेच ही ताकद आपल्याकडे कशी येईल याचे प्रयत्न शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपकडून केले जातील.
आगामी स्थानिकची निवडणूक ही स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी असते. येथे एखादा चांगला मोहरा पक्षाच्या वाढीसाठी मिळतो का हे पाहण्याचे सध्या काम सुरू आहे. यासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना सत्तेची गाजरं दाखली जातायतं. तसेच साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करत राजकीय यंत्रणा हाताशी धरूनही आपल्या पक्षात खेचलं जात आहे. यामुळे कोकणात कणखर असणारी शिवसेना आज कमकुवत होताना दिसत आहे.
आता यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असून पक्षाचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभियान राबवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या अभियानापूर्वीच पक्षातील मरगळ झटकून निष्ठावंत शिवसैनिकांना ताकद द्यावी लागणार आहे. निष्ठावंत शिवसैनिकांची खंत आणि नाराजी काय आहे हे समजून घेऊन नव्या-जुन्यांची मोट बांधावी लागणार आहे. पक्ष पातळीवर निर्णय घेण्यासह ठाकरेंसह मुख्य नेत्यांचा कोकणात दौरा लवकर करावा लागणार आहे. अशी रणनीती झाली तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या जातील. अन्यथा कोकणात उरले सुरले शिवसेनेचे बुरूजही आगामी स्थानिकच्या आधी ढासळतील हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.