ShivSena UBT - MNS Alliance : दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? या चर्चांनी राज्याचे राजकारण काही दिवसांपासून ढवळून निघाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यातही मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या महत्वाच्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संभाव्य युतीला महत्व प्राप्त झाले आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर काय? महाविकास आघाडी राहणार का? की राज ठाकरेच महाविकास आघाडीत येणार? भाजप आणि शिवसेनेचे मराठी, हिंदू या मुद्द्यांभोवती फिरणारे राजकारण दोन्ही ठाकरे बंधू कॅप्चर करणार का? अशा अनेक प्रश्नांनी सध्या मतदारांना आणि सामान्य जनतेला भेडसावले आहे.
यातीलच काही मुद्द्यांवर राजकीय तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यावर मनसेसंदर्भात राजकीय तज्ज्ञांमध्ये वेगवेगळे सूर आहे. मराठी अस्मितेच्या मुद्यावर जर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणाचा पोत बदलेल, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक हरिष वानखेडे यांनी सांगितले. तर मुंबई पालिकेच्या निवडणुका या स्थानिक व भावनिक प्रश्नावर लढल्या जातात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून ज्या पद्धतीने भाजपने माघार घेतली; त्यावरून राजकारणात मराठी अस्तिमेचा मुद्दा अजून कायम असल्याचे स्पष्ट झाल्याची आठवणही वानखेडे यांनी करून दिली.
अजूनपर्यंत सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाला एकही मोठा मुद्दा उभा करता आला नाही; मात्र मुंबईत मराठी अस्मितेच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष केव्हाही जिवंत होऊ शकतो, असा दावाही यावेळी वानखेडे यांनी केला. त्याचवेळी राज ठाकरे यांच्याकडे सध्या कुठलीही ‘व्होट बँक’ नाही. याउलट उद्धव ठाकरे यांना नव्याने मुस्लिम, नवबौद्ध मतदार जोडले गेले आहेत. त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास इतर समाज ठाकरेंपासून दुरावले जाण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय तज्ज्ञ आणि ओपी जिंदाल ग्लोबल विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सुमित म्हसकर यांना वाटते.
विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक हा उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी कुठल्याही स्थितीत मुंबई पालिका जिंकण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. आजघडीला भाजपकडे संघटना, अजस्र निवडणूक यंत्रणा, राज्य आणि केंद्रात सत्ता या जमेच्या बाजू आहेत. उद्धव ठाकरे यांचे अनेक नगरसेवक शिवसेनेत गेले आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपचे पारडे जड आहे. यात त्यांनी राज ठाकरेंनी युतीसाठी हात पुढे केला असता त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असेही काही तज्ज्ञांना वाटते.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. तर महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ 20 जागा मिळाल्या. या दोन्ही निवडणुकीत महत्वाचा फरक होता तो मनसेचा. मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती तर विधानसभेची निवडणूक लढवली होती.
विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यश मिळाले नाही. तर मनसेला एकही जागा मिळाली नाही. या पराभवाचे एक कारण म्हणजे दोघे जण वेगळे लढल्यामुळे झालेले मराठी मतांचे विभाजन. याच मतांच्या विभाजनामुळे मुंबईत दोन्ही पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला होता. राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्यामते, मुंबईमध्ये 35 टक्के मराठी समाज आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर जर दोन्ही पक्ष एकत्र येत असतील तर मराठी मतांचे विभाजन टळू शकते, असा अंदाज आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर राज ठाकरे हे सुट्ट्यांसाठी परदेशी गेले. नेमके त्याच वेळी उद्धव ठाकरे देखील परदेशी रवाना झाले. मनसेच्या नेत्यांकडून युतीच्या विरोधात वक्तव्य केली जात होती. त्यावेळी राज ठाकरेंनी याबाबत नबोलण्याचे आदेश मनसेतील पदाधिकारी,नेत्यांनी दिले होते. नेमके त्याचवेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या परदेशात युती विषयी चर्चा होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र या चर्चांना अधिकृत पुष्टी मात्र मिळू शकली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.