
भाजप प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नियुक्तीची घोषणा होताच, डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण यांच्या राजकीत कारकिर्दीची चर्चा सुरू झाली. एक 'हरकाम्या' कार्यकर्ता ते भाजप प्रदेश कार्याध्यक्षपदाचा चव्हाण यांच्या राजकीय प्रवासाचे किस्से डोंबिवलीकर रंगून रंगून सांगतोय. सामान्य कार्यकर्ता म्हणून 25 वर्षांपूर्वी त्यांनी राजकीय क्षेत्रात कामाला सुरवात केली. पुढे भाजपचा समर्पित कार्यकर्ता ते बड्या नेत्यांचा निकटचा कार्यकर्ता, असा प्रवास करत भाजप नेत्यांच्या गळ्यातला ताईत म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
मुळात डोंबिवली हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे एक महत्वाचे ठिकाण मानले जाते. इथे उच्चशिक्षित आणि कट्टर संघ कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे. अशा वातावरणात रवींद्र चव्हाण यांना संघ आणि भाजपच्या वर्तुळात प्रवेश मिळवणे कठीण होते. मात्र, अतिशय धोरणी राजकीय वाटचाल करत, त्यांनी थेट पक्षाच्या कार्याध्यक्षपदावर पकड मिळवली आहे.
रवींद्र चव्हाण यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. नोकरी-व्यवसाय नसल्यामुळे काही काळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वर्तुळात ते दिसून आले. त्यातून त्यांच्यावर काही आरोप झाले होते. परंतु आरोप पुसले गेले अन् पुढे स्वच्छ प्रतिमा तयार करण्यात ते यशस्वी झाले. राजकारणात शिरकाव केल्यानंतर त्यांच्या कामाच्या गतीमुळे भाजपमध्ये त्यांना एक महत्त्वाची ओळख मिळाली. त्या काळातील शिस्तप्रिय आणि तत्त्वनिष्ठ भाजप मंडळींतून रवींद्र चव्हाण आपले स्थान तयार करत गेले. विनोद तावडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना समर्थन दिले. चव्हाण यांनी सावरकर रोडवर नगरसेवक म्हणून प्रवेश केला आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रगतीचा मार्ग सुरु झाला.
चव्हाण यांनी सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात देखील आपल्या नेतृत्वाची छाप सोडली. डोंबिवलीतील उच्चशिक्षित वर्गाच्या विविध गरजा ओळखून त्यांनी एक मासिक सुरू केले, ज्यामध्ये प्रतिष्ठित डॉक्टर, वकील, पत्रकार, कलाकार यांचे योगदान प्रकटवले. या मासिकाद्वारे, चव्हाण यांच्या कार्याची माहिती मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे चव्हाण हे अतिशय कर्तृत्ववान व दानधर्म करणारे राजकीय व्यक्ती आहेत, असा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोचला. दरम्यान डोंबिवलीच्या भौतिक विकासावर, विशेषतः डोंबिवलीच्या आखीव रेखीव विकासाकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. अनेक वादग्रस्त बांधकामांची वाढती संख्या आणि विकासाच्या काही योजनांवर लक्ष देणे आवश्यक होते.
ठाण्यात शिवसेनेचे मोठे आव्हान भाजप समोर होते. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व चव्हाण यांच्यासाठी आव्हान ठरले. पण त्याने 'शिवसेने'च्या विरोधात एक आक्रमक भूमिका घेतली, ज्यामुळे भाजपला डोंबिवलीमध्ये प्रतिष्ठा मिळाली. याच कालावधीत अनेक जुन्या अनुभवी नेत्यांना डावलून पक्षाने रवींद्र चव्हाण यांना स्थायी समितीचे सभापतीपद दिले.
दरम्यान, शहरातील गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून बीएसयूपी योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. नियोजन समितीचे सभापती म्हणून विकासनिधीच्या वितरण व नियोजनाची जबाबदारी चव्हाण यांच्याकडे होती. पुढे मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा नोंदवला गेला. सुमारे 13 हजार घरांची योजना अवघ्या साडेचार हजार घरांवर आली.
चव्हाण राज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या सहकार्याने पुढे आले. त्यांना केंद्रीय भाजप नेतृत्वात महत्त्वाची भूमिका दिली गेली, पण काही काळाने त्यांच्या कामावर नेत्यांमध्ये असमाधान व्यक्त होऊ लागले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि चव्हाण यांच्यातील धुसफूस विकासाच्या मुळावर आल्याचे बोलले जात आहे. डोंबिवलीच्या राजकारणात चव्हाण यांनी शंभर टक्के ताकदीने भूमिका घेतली, परंतु ते आज ज्या पद्धतीने पक्षांतर्गत विरोध आणि संघर्ष यांचा सामना करत आहेत, त्यातून त्यांच्या पुढील वाटचालीत आव्हाने अटळ असल्याचे दिसते.
डोंबिवलीतील राजकारणाचे अन्वयार्थ अधिक व्यापकपणे समजून घेतल्यास, रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हे केवळ स्थानिक स्तरावरच नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि वादांचा विषय ठरला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्याची ओळख आणि त्याचा प्रभाव हळूहळू वाढला. त्यांचा उंचावलेला राजकीय दर्जा, शिस्तप्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख, आणि त्यांच्या कामाने डोंबिवलीतील भाजपचा बळकट पाया तयार केला.
निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपला यश मिळवून दिले असले तरी, डोंबिवलीतील काही प्रमुख मुद्दे अनुत्तरीत राहिले. स्थानिक विकासातील अडचणी, गुन्हेगारीचा वाढता प्रपंच आणि नगरपालिकेतील योजनांच्या अंमलबजावणीतील गडबड यामुळे चव्हाण यांच्यावर काही टीका केली गेली. डोंबिवलीच्या राजकारणात विकासाच्या दृष्टीकोनाने काही बाबी बाजूला राहिल्या. परिणामी चव्हाण यांच्या कार्यकाळात अनेक विकास योजनांमध्ये गोंधळ व अस्थिरता दिसून आली. हे सर्व घटक डोंबिवलीच्या भविष्यातील राजकीय व सामाजिक वातावरणावर मोठा प्रभाव पाडणारे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.