Uattar Maharashtra News : उत्तर महाराष्ट्र हा तसा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपच्या खासदारांना इथल्या मतदारांनी नेहमीच साथ दिली आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणामध्येदेखील भाजपकडे मतदारांचा कल दिसून येतो. परंतु, अजूनही सर्व ठिकाणची उमेदवारी जाहीर हाेणे बाकी आहे. त्यामुळे उमेदवार किती तुल्यबळ आहे, यावरदेखील काही प्रमाणात निवडणुकीचा कल पाहायला मिळणार आहे. प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर मतदारांचा कल कसा राहील, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र आणि देशाचे राजकीय मन जाणून त्यातून मत मांडण्याच्या उद्देशाने 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने उमेदवार जाहीर होण्याआधी सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून पुणे, मुंबईसह राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदारांची मते जाणून घेण्यात आली.
नाशिक लोकसभेचा कल भाजपकडे असला तरी ही जागा शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजयश्री प्राप्त केलेले हेमंत गोडसे हेच यंदाही शिंदे शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विजय करंजकर मैदानात असतील. भाजपने या जागेवर दावा सांगितला आहे. मात्र, पारडे शिंदे शिवसेनेचे जड दिसत आहे. भाजप गोडसेंसाठी कशारितीने मैदानात उतरेल, हे पाहणे इथे महत्त्वाचे ठरेल. विजय करंजकर यांचे तगडे आव्हान गोडसेंसमोर असेल. भाजपकडे कल असला तरी विद्यमान खासदारांबद्दल पदाधिकारी, पक्ष, मित्रपक्ष या सगळ्यात नाराजीची स्थिती आहे. त्यामुळे इथे आत्यंतिक चुरस निश्चितपणे होईल, अशी चिन्हे आहेत. निष्ठावंत शिवसैनिक विरुद्ध फुटीर शिवसैनिक असा सामना इथे निश्चितपणाने रंगेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा खासदार शरद पवार यांचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. गेल्या निवडणुकीच्या तोंडावर भारती पवार यांचा भाजपत प्रवेश होऊन त्या खासदार झाल्या. पुढे केंद्रात राज्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. भारती पवार यांच्या एकूण कामगिरीबाबत भाजपतील दिल्लीश्वर खूष असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्याबद्दलची नाराजी निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे शरद पवारांची खेळी इथे निर्णायक ठरणार आहे. आव्हान देणारा तगडा उमेदवार आणि थेट समोरासमोर लढत झाल्यास भाजपसाठी इथे मोठी अडचण होणार आहे. भारती पवार यांचे तिकीट निश्चित असल्याने समोर कोण, हे अद्याप गुलदस्तात आहे. भाजपविरुद्धच्या वातावरणात कांदाप्रश्नाची मोठी भूमिका आहे.
धुळ्यातील मतदार हे पारंपरिक भाजपचे मतदार आहेत. भाजपसाठी या मतदारसंघात अनुकूल वातावरण असले तरीदेखील इथे उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे, काँग्रेसमधून पाच वर्षांपूर्वी भाजपत आलेले तरुण नेते हर्षवर्धन दहिते, मालेगावातील अॅड. शिशिर हिरे, माजी पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. काँग्रेसकडून डॉ. तुषार शेवाळे यांचे नाव आघाडीवर आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या संदर्भातील चर्चेने मधल्या काळात उचल खाल्ली होती. आमदार पाटील यांची भूमिका धुळ्यात निर्णायक ठरणार आहे. भाजपसाठी इथे अनुकूल वातावरण आहे. ‘एमआयएम’ची भूमिका काँग्रेसच्या संदर्भात निर्णायक असेल. धुळ्यात अमरिश पटेल यांची भूमिकादेखील निर्णायक ठरणारी आहे.
सध्या नंदूरबारमध्ये खासदार हीना गावित आणि संपूर्ण गावित कुटुंब यांच्याविषयी नाराजीची भावना आहे. गावित कुटुंबीय याविरुद्ध अन्य सगळे नेते अशी स्थिती इथे दिसून येते. भाजपसाठी अनुकूल असलेल्या या मतदारसंघाला सध्या कौटुंबिक त्रासाने ग्रासले आहे. त्यामुळे गावित कुटुंबातील उमेदवार दिल्यास नंदूरबार भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. मात्र, हीना गावित यांनी दिल्लीश्वरांचे मन जिंकले असल्याने उमेदवारीबाबत वेगळा विचार होण्याची शक्यता कमी दिसते. स्वरूपसिंह नाईक यांच्या स्नुषा रजनी नाईक या काँग्रेसच्या उमेदवार होऊ शकतात. नंदूरबारमध्येदेखील अमरिशभाई पटेल कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत.
जळगाव लोकसभेतील तरुण खासदार उन्मेष पाटील हे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतील आहेत. जळगाव मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवार बदलूनही भाजपचा वरचष्मा राहिला होता. आता पुन्हा विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याची चर्चा सुरू आहे. खासदार पाटील यांना स्थानिक नेतृत्वाला खूष करणे न जमल्याने विद्यमान खासदार विरुद्ध स्थानिक पक्ष अशी स्थिती आहे. गेल्यावेळी ऐनवेळी तिकीट नाकारल्या गेलेल्या स्मिता वाघ किंवा रोहित निकम यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. विरोधकांची इथे फारशी तयारी नाही. ठाकरे गट मैदानात असेल, मात्र नावावर एकमत इथे दिसून येत नाही. उद्धव ठाकरेंचे जुने निष्ठावंत गुलाबराव वाघ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.
रावेर लोकसभेतील समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याभोवती फिरत आहे. मध्यंतरी खडसे यांच्या भाजपतील प्रवेशाची चर्चा रंगली होती, पण ती चर्चा बारगळली. आता विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारल्यास स्वतः एकनाथ खडसे निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रवादीकडून असतील, हे स्पष्ट आहे. भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने रक्षा यांच्याऐवजी कोण हा प्रश्न आहे. त्यावेळी माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे मैदानात असतील. जावळे विरुद्ध खडसे ही तरुण विरुद्ध ज्येष्ठ लढत चुरशीची होईल. खडसे जंगजंग पछाडतील, तर जावळे कोरीपाटी असल्याने त्यांना भाजपच्या वलयाचा फायदा होईल. त्यामुळे रावेरची स्थिती दोलायमान पद्धतीने दिसून येते.
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.