
Sangli Politics News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. दुसरीकडे, संजयकाका पाटील यांचा नियोजित मेळावा देखील जिल्ह्याच्या राजकारणात निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारणात दोन्ही पाटलांबाबत भाजप काय भूमिका घेणार यावर सांगलीतील राजकीय गणितं अवलंबून आहेत.
माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील हे भाजपमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पाटील यांनी वारंवार खुलासा देऊनही ही चर्चा थांबली नव्हती. गोपीचंद पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर विरोधी पक्षांकडून काढलेल्या मोर्चाला भाजपने इशार सभेतून उत्तर दिले. मात्र, या सभेत जयंत पाटील यांना भाजपमध्ये आले तर काय होईल, हे चंद्रकांत पाटलांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी, 'जयंत पाटील यांना भाजपमध्ये आले तर त्यांना 'गोपीचंद तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशी घोषणा गोपीचंदच्या पाठीमागे बसून द्यावी लागेल.', असे म्हटले. मात्र, जयंत पाटील भाजपमध्ये नकोच, असे म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यावेळी त्यांना भाजप घेतले जाणार नाही. आज रात्रीच देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सांगलीतील भाजप पदाधिकारी आणि नेत्यांच्या भावना कळवल्या जातील, असे म्हटले.
त्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाला सांगलीतील स्थानिक पदाधिकारी आणि महाडिक गटाचाही विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, सांगलीच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या जयंत पाटील कशा प्रकारे उत्तर देतात याचीच उत्सुकता त्यांच्या समर्थकांना आहे.
माजी खासदार संजयकाका पाटील यांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. भाजपकडून लोकसभा, तर राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये 'घर वापसी'ची चर्चा सुरू झाली होती. मात्र, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा भाजप प्रवेशाचा चेंडू थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात टाकला.
संजयकाका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याने त्यांचे पुनर्वसन अजित पवारांनी करायचे आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जवळपास संपुष्टात आल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तासगाव येथे होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगली जिल्हा परिषद आणि सांगली महापालिका निवडणुकी संदर्भात संजय पाटील गट नेमकी काय भूमिका घेणार, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
जयंत पाटील सध्या तरी भाजपमध्ये जाण्यास नकारात्मक आहेत आणि भाजप नेत्यांनी प्रवेशाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. तर संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या दोन 'पाटलां'च्या भूमिकेवरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणित अवलंबून असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.