
Sangli News : आगामी स्थानिकच्या तोंडावर सांगलीत सध्या राजकारण चांगलेच तापत चालले आहे. काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने यात आणखी भडका उडवून दिला आहे. जयश्रीताईंना प्रवेश देवून भाजपने जिल्ह्यात मजबूत होणाऱ्या राष्ट्रवादीचा गेम केलाच आहे. त्याचबरोबर सव्वाशे वर्ष परंपरा असणाऱ्या मिरज विधानसभा मतदार संघातून काँग्रेसला हद्दपार करण्याचीही खेळी खेळली आहे. यामुळे सध्या येथे काँग्रेसलाही घरघर लागण्याचा धोका आहे. सध्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील राजकीय गोंधळ निर्माण झाला असून कोणता झेंडा हाती घेऊ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगलीत वसंतदादा पाटील घराणे भाजपबरोबर यावे असे अनेक वर्षांपासून वाटत होते. हे कबूल केलं आहे. याचाच अर्थ भाजपला दादा घराणे आपल्याबरोबर घेऊन येथून काँग्रेस हद्दपार करायची होती. यासाठी भाजपच्या नेत्यांनी विडा उचलला होता. यात सगळ्यात मोठी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू, अत्यंत जवळचे मानले जाणारे जनसुराज्य शक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी बजावली. त्यांची भूमिका येथे किंगमेकर ठरली असून त्यांनीच जयश्रीताईंच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांशी संपर्क ठेवला. तर शेवटी त्यांना भाजपमध्ये आणले ही.
जयश्री पाटील यांनी विधानसभेला बंडखोरी केली आणि त्यांच्यावर निलंबणाची कारवाई झाली. यानंतर त्या राजकीय पुनर्वसनाच्या संधीची वाट पाहत होत्या. यादरम्यान त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची संधी निर्माण झाली. तशी अटकळही बांधली जात होती. पण सर्वांचे अंदाज फोल ठरले आणि जयश्रीताई भाजपवासी झाल्या. पण त्यांच्या या निर्णयामुळे मिरजेसह जिल्ह्यातील काँग्रेस आणि मदनभाऊ गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या राजकीय गोंधळात आले आहेत. अनेकांची गोची झाली असून आपण कोणाबरोबर जायचं असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे आता हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जयश्रीताईंबरोबर भाजपमध्ये जाणार की काँग्रेसमध्येच राहून जयश्री ताईंशीच आगामी स्थानिकमध्ये दोन हात करणार याकडे मतदारसंघातील लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
मिरज मतदारसंघ हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला मानला जात होता. स्व.मोहनराव शिंदे यांनी विजयाची हॅट्रीक साधली होती. तर स्व.हाफिजभाई धतुरे यांनी दोन वेळी विजय मिळवून येथे काँग्रेस टिकवली होती. एकेकाळी येथे काँग्रेसला प्रचंड मताधिक्ष्य होते. आमदार हा काँग्रेसचाच असायचा. नगरपालिका, महापालिका जिल्हा परिषद, पंचायत समितीवर काँग्रेसचेच अधिराज्य होते. तसेच जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समितीसह महत्वाच्या संस्थांवर देखील काँग्रेसचेच वर्चस्व होते. पण मागच्या केंद्रासह राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तणाचा येथे मोठा बदल झाला आहे. मतदार संघात काँग्रेसला घरघर लागली आहे.
भाजपने येथील काँग्रेस हद्दपार करण्यासाठी विडाच उचलला होता. याची सुरूवात 2009 साली विधानसभेला सुरेश खाडे यांच्या रूपात झाली. त्यांनी मिरज मतदार संघात भाजपचा झेंडा फडकवत काँग्रेस संपवण्याची विट ठेवली. ते येथे गेली चार टर्म आमदार आहेत. याचा थेट फायदा भाजपमधील इतर नेत्यांनी उचलत महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता हस्तगत केली. आता भाजप तालुक्यातील ग्रामपंचायतीवर देखील झेंडा फडवण्याच्या तयारीत आहे. अशा पद्धतीने सव्वाशे वर्ष परंपरा असणाऱ्या काँग्रेला भाजपने हद्दपार केले आहे.
गेल्या काही वर्षांत येथे निवडणुकीत काही अपवाद वगळता काँग्रेसची पिच्छेहाटच झाली आहे. पण तरीही माजी खासदार प्रतिक पाटील असो किंवा जयश्रीताईंचा मदनभाऊ गट असो किंवा विद्यमान खासदार विशाल पाटील असो यांनी काँग्रेस जीवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण आता भाजपमुळे येथील राजकारण बदलले असून काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. आता शहरात आणि शहरा लगत भाजप आमदार सुरेश खाडे यांचे वलय निर्माण झाले आहे. ज्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी भाजपकडे जाताना दिसत आहेत.
त्यातच आता खुद्द जयश्रीताईंनीच आपल्या खादां भाजपला दिल्याने निरजेतील उरली सुरली काँग्रेसला घरघर लागण्याची शक्यता आहे. तर ज्या नेत्यामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेशी जोडले गेले होते. ते देखील राजकीय गोंधळात आहेत. जर या लोकांनी जयश्रीताईंबरोबर जाण्याचा विचार केल्यास तेही भाजपवाशी होतील. ज्यामुळे परंपरा असणाऱ्या मिरज विधानसभा मतदार संघातून काँग्रेसला हद्दपार होण्याची धोका आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.