
Sangli News : राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्रीताई पाटील या आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपमध्ये आणले आहे. अद्याप त्यांचा प्रवेश झाला नसून तो उद्या (बुधवार ता. 18) मुंबईत होणार आहे. पण याआधीच चंद्राकांत पाटील यांनी जयश्री पाटलांच्याबाबत मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता प्रवेशाच्या आधीच भाजपने रिटर्न गिफ्ट दिल्याची चर्चा सांगलीत सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.
पण या प्रवेशाच्या आधीच सांगलीत चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांची वर्णी जिल्हा नियोजन समितीवर लागल्याची घोषणा केलीय. ही घोषणा त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. तर जयश्री पाटील यांच्याबरोबरच विट्याचे वैभव पाटील यांचाही नियोजन समितीत समावेश करण्यात आला आहे. तसेच इतर सर्व मित्र पक्षांच्या नावासह 11 जणांची यादी निश्चित केल्याची माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. पण ती नियोजन समितीवरील निमंत्रित सदस्यांच्या शिवाय झाली. यावरून पाटील यांना विचारले असताना त्यांनी, नियोजन समितीवरील निमंत्रित सदस्यांची नावे अंतिम केली आहेत. फक्त दोन सदस्यांची नावे राहिली होती. आता ती देखील अंतिम झाली असून जयश्री पाटील व वैभव पाटील यांना संधी देण्यात आली आहे. सर्व 11 सदस्यांची यादी अंतिम मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सकाळीच जयश्री पाटील यांच्या ‘विजय’ या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाचे स्वागत केले. जयश्री पाटील यांना दिलेले शब्द पाळले जातील. त्यांचा व कार्यकर्त्यांचा योग्य मान राखला जाईल, असा शब्द दिला होता. त्यानंतर काही वेळात झालेल्या नियोजन बैठकीनंतर त्यांनी जयश्री पाटील यांची नियोजनवर वर्णी लावल्याचे जाहीर केले.
भारती दिगडे, दीपक शिंदे, संग्राम देशमुख, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, पद्माकर जगदाळे, समित कदम, जयश्री पाटील, वैभव पाटील, अमोल पाटील, राजेंद्र खरात, आनंदराव पवार व तानाजी पाटील ही नावे नियोजन समितीवर निमंत्रित व विशेष निमंत्रित म्हणून निश्चित केली आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांना काही शब्द दिले आहेत. ते पाळले जातील असेही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी जयश्रीताई आणि त्यांच्या दोन्ही मुलींना तातडीने वसंतदादा बँकेच्या प्रकरणातून मोकळं करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा वसंतदादा बँकेच्या प्रकरण असल्याचे आता समोर येत आहे. मात्र जयश्री पाटील यांनी ‘फक्त आमचं नको, सर्वांचा विषय एकदम सोडवा.’ असा आग्रहही धरल्याचे कळत आहे. यावर त्या सर्वांचा विचार करतात, हेच समोर आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.