
थोडक्यात बातमी:
1.सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे अडथळ्यांत सापडला आहे, कारण कोल्हापुरातील भाजप नेते याच्या समर्थनार्थ स्पष्टपणे पुढे येत नाहीत.
2.विरोधक आक्रमक भूमिकेत: आमदार सतेज पाटील, राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी या प्रकल्पाविरोधात जोरदार मोहिम उभारली असून शेतकऱ्यांच्या पाठिंब्याचा मुद्दा अधोरेखित केला जात आहे.
3. नेत्यांची सावध भूमिका: पालकमंत्री आबिटकर, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक यांसारख्या नेत्यांनी कोणतीही ठोस भूमिका न घेता "शेतकऱ्यांचा निर्णय मान्य" अशी धोरणात्मक आणि सोयीस्कर भूमिका घेतली आहे.
Kolhapur News : राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध होत असताना कोणत्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या महामार्गाकडे पाहिले जाते. दुसरीकडे इंडिया आघाडीतील नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी या महामार्गाच्या विरोधात रान उठवले आहे. गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग नको, हीच भूमिका आमदार पाटील यांनी घेतली आहे.
दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी त्यांनी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. या परिस्थितीत इंडिया आघाडीकडून विरोधकांनी दबाव निर्माण केला असताना या महामार्गाच्या समर्थनार्थ महायुतीतील केवळ दोनच आमदार जिल्ह्यातून फाईट देताना दिसत आहेत. मात्र भाजपच्याच नेत्यांचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा हा शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात बोलायला कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या एकाही नेत्याचे तोंड अद्याप उघडलेले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या शक्तीपीठ महामार्गाकडे पाहिले जाते. वास्तविक इंडिया आघाडीतील नेते या महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून संघर्षाला अधिक धार आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात या प्रश्नावर आवाज उठवला आहे.
माजी खासदार शेट्टी यांनी या विरोधात रान उठवले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील पदाधिकारी देखील शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावरची लढाईत सहभागी आहेत. एकंदरीतच इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील या आंदोलनात संदर्भात एकमत ठेवण्यासाठी समन्वय ठेवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांची यंत्रणा कार्यान्वित आहे. वास्तविक या विरोधाच्या मागे किती शेतकरी उभे आहेत? हा मुद्दा समोर येत असला तरी विरोधकांनी सुरू ठेवलेला संघर्ष सरकारला धडकी भरवणारा आहे.
तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Mahamarg) समर्थनार्थ कोल्हापूर जिल्ह्यातून केवळ राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हेच बाजू मांडताना दिसत आहेत. दुसरीकडे चंदगडचे भाजपचे सहयोगी सदस्य आमदार शिवाजीराव पाटील यांनी देखील या महामार्गाची गरज असल्याचे सांगत पदयात्रा काढली. पण जिल्ह्यातील भाजपचे नेते यासंदर्भात विरोधकांना प्रत्युत्तर न देण्याची सावध भूमिका घेतल्याचे दिसतात. जिल्ह्यातील भाजपकडे रस्त्यावर संघर्ष करणारा पदाधिकारी आणि कार्यकर्ताच शिल्लक नाही की काय? अशी शंका आहे.
उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर भाजपचे काही मोजकेच पदाधिकारी गर्दी करताना दिसतात. तर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक हे विरोधकांवर बोलण्याची भूमिका घेताना दिसत नाहीत. केवळ आपला गट सांभाळण्यात ते धन्यता मानत आहेत की काय? अशी शंका आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दहा आमदार महायुतीचे असताना यामध्ये कोणताच समन्वय दिसून येत नाही. जिल्हा नियोजन समितीची सदस्य निवड संख्याबळावरून रखडली आहे. जिल्ह्यातील समिती, महामंडळ आणि त्यावरील पदे देखील रखडली आहेत. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणताच समन्वय नसल्याचं कोल्हापूर जिल्ह्यात चित्र आहे.
शिरोळ आणि हातकलंगलेतील आमदारांनी महामार्गाला विरोध असल्याचे पत्र दिले असल्याचा दावा महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहे. मात्र उघडपणे भूमिका हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांना दिसत नाहीत.
शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दोन महिन्यापूर्वी कोल्हापुरात मेळावा घेतला. या मेळाव्याला राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी तिकीट महामार्गाला समर्थन देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते.
शक्तिपीठ महामार्गाला त्यांचे समर्थन असले तरी आजची परिस्थिती पाहता विरोधक शक्तिपीठ महामार्ग बद्दल जनभावना निर्माण करताना दिसत आहेत. पण त्याच पद्धतीने महायुतीतील नेत्यांकडून केवळ एक दोन आमदार वगळता विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची धमक इतर नेत्यांमध्ये दिसत नाही.
शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सोयीस्कर भूमिका दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची आहे. यांची सहमती असेल, शक्तिपीठ महामार्ग होईल, असेही स्पष्टीकरण देत सारवण घालण्याचा प्रयत्न दोन मंत्र्यांकडून सुरू आहे. मात्र ठाम भूमिका घेण्याची मानसिकता सध्या तरी दिसून येत नाही.
प्रश्न: शक्तीपीठ महामार्ग कोणाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे?
उत्तर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा.
प्रश्न: सतेज पाटील या महामार्गाबाबत कोणती भूमिका घेत आहेत?
उत्तर: त्यांनी या महामार्गाला गरज नसल्याचं सांगून विरोध सुरू केला आहे.
प्रश्न: महायुतीतील कोणी या प्रकल्पाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत का?
उत्तर: केवळ राजेश क्षीरसागर आणि शिवाजीराव पाटील यांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे.
प्रश्न: भाजप नेत्यांनी या प्रकल्पावर कोणती भूमिका घेतली आहे?
उत्तर: बहुतेक नेत्यांनी मौन बाळगले असून विरोधकांना प्रत्युत्तर देत नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.