ममतांचा दे धक्का! भाजपचे 2 आमदार कमी करून आपले 4 वाढवले

पश्चिम बंगालमधील चार विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपला धूळ चारली आहे.
Narendra Modi and Mamata Banerjee
Narendra Modi and Mamata BanerjeeFile Photo

कोलकता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) चार विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Bypoll Election) तृणमूल काँग्रेसने (TMC) भाजपला (BJP) धूळ चारली आहे. चारही जागांवर तृणमूलच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या चारपैकी तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपचे 2 आमदार कमी करुन आपले 4 आमदार वाढवले आहेत.

पश्चिम बंगालमधील दिनहाटा, शांतीपूर, खरदा आणि गोसाबा या मतदारसंघात 30 ऑक्टोबरला मतदान झाले होते. मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलने भाजपचा पराभव करत राज्यात सत्ता मिळवली. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राममध्ये पराभव झाला होता. नंतर पारंपरिक भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यानंतर काही दिवसांतच चार मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या.

या विजयावर बोलताना तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन म्हणाले की, तृणमूलने चारही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी भाजप आणि डावे पक्ष यांच्यात चुरस पाहायला मिळाली. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या बूथमध्येच भाजपचा पराभव झाला. भाजपच्या 4 पैकी 3 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अमित शहा बहुदा पुढील दिवाळीपर्यंत बंगलला येणार नाहीत.

दिनहाटा मतदारसंघात तृणमूलचे नेते उदयन गुहा यांचा तब्बल 1 लाख 60 हजार मताधिक्याने विजय झाला आहे. या मतदारसंघातून एप्रिमलमध्ये झालेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री निसिथ प्रमाणिक यांनी विजय मिळवला होता. पण त्यावेळी ते खासदारही होते. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर काही दिवसांत त्याच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडली. ते या मंत्रीमंडळातील सर्वात तरूण मंत्री आहेत. आता त्यांच्यात मतदारसंघात भाजपचा दारूण पराभव झाला आहे.

Narendra Modi and Mamata Banerjee
शेतकरी आंदोलन महागात; सत्ता असलेल्या राज्यातच भाजपचा पराभव

गोसाबा विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सुब्रत मंडल यांनी तब्बल 1 लाख 40 हजार मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यांना एकूण मतदानाच्या 87 टक्के एवढी मते मिळाली आहेत. खरदा मतदारसंघात कृषी मंत्री शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी भाजपच्या उमेदवाराचा 93 हजार मतांनी पराभव केला आहे. चट्टोपाध्याय हे आधी भवानीपूर मतदारसंघातून निवडून आले होते. पण त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही जागा सोडली. त्यांना खरदा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.

Narendra Modi and Mamata Banerjee
बालेकिल्ल्यातच पराभव अन् भाजपचे मुख्यमंत्री म्हणाले, ही तर महागाईची कमाल!

गोसाबा व खरदा मतदारसंघात तृणमूलच्या आमदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार यांनाही मोठा धक्का बसला आहे. एप्रिल महिन्यातील निवडणुकीत शांतीपूर मतदारसंघातून ते विजयी झाले होते. पण खासदारकी वाचवण्यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत तृणमूलचे उमेदवार ब्रिजकिशोर गोस्वामी यांनी भाजपचा 64 हजार मतांनी पराभव केला. चारही मतदारसंघात विजय मिळाल्याने तृणमूलच्या आमदारांची संख्या वाढली आहे. तर भाजपची संख्या दोनने कमी झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com