Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
ठाणे

Thane Lok Sabha Constituency : 'ठाणे'दार कोण? लोकसभेच्या दावेदारीत महायुतीच्या तिसऱ्या पार्टनरची एन्ट्री

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर

Thane Political News :

ठाणे (Thane) लोकसभा मतदारसंघावर (Lok Sabha Election) यापूर्वीच शिवसेनेने(शिंदे गट) दावा सांगितला आहे. तर गेलेला गट काबिज करण्यासाठी भाजपनेही ठाण्यावर दावा केला आहे. आता हे कमी म्हणून की काय या वादात महायुतीतील तिसरे इंजिन अजित पवार गटाने एन्ट्री केली आहे. त्यामुळे 'ठाणे'दार कोण? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सध्या राजन विचारे (Rajan Vichare) हे शिवसेनेचे (ठाकरे गट) ठाण्याचे खासदार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde) यावर दावा केला आहे. तर ठाणे हा भाजपचा गड असून तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. आता अजित पवार (Ajit Pawar) गटानेही 'ठाणे'दार आमचाच म्हणत, दावा केल्यामुळे नक्की कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

दरम्यान, ठाण्याच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असेही सांगितले जात आहे. पण, भाजप आणि अजित पवार गटाची या दावेदारीत जमेची बाजू अशी आहे की, भाजपच्या इच्छुकांमध्ये दोन उमेदवार हे माजी खासदार आहेत. तर, अजित पवार गटाचे एकमेव उमेदवारही माजी खासदार आहेत. तर शिंदे गटातील उमेदवारांमध्ये कुणीही आजी-माजी खासदार नसल्याने त्यांची बाजू तशी लंगडीच असल्याचे दिसत आहे.

एकेकाळी ठाणे जिल्हा भाजपचा गड होता. पण, कालांतराने तो गड शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आग्रहामुळे खासदार राम कापसे असताना 1996 मध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली. त्यानंतर प्रकाश परांजपे शिवसेनेचे खासदार झाले. सलग तीनवेळा ते खासदार होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र आनंद परांजपे (Anand Paranjpe) खासदार झाले. त्यानंतर हा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक (Sanjeev Naik) हे खासदार झाले. त्याच्यानंतर सलग दोन वेळा राजन विचारे या मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.

आता हा मतदारसंघ खेचण्याची नामी संधी भाजपकडे चालून आलेली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर या मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे. एवढेच नाही तर भाजपनेही तयारीही सुरू केली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने त्यांच्या गटाने या मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे. तर अजित पवार गटाने या दावेदारीत आनंद परांजपे यांचे नाव पुढे आणले आहे.

शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेश म्हस्के (Naresh Maske) आणि प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर भाजपमध्ये माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) तसेच माजी खासदार विनय सहस्त्रबुध्दे (Vinay Sahasrabuddhe) यांच्यासह आणखीही काही नावे चर्चेत आहेत.

ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेच्या निमित्ताने ठाण्यात येत्या रविवारी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

महायुतीच्या बैठकीत इच्छुकांमधील नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार आनंद परांजपे, संजीव नाईक, आमदार संजय केळकर आदी उपस्थित होते. त्यामुळे आता मेळाव्यापर्यंत महायुतीचा 'ठाणे'दार कोण या निर्णय होणार काय, याची उत्सुकता ठाणेकरांनाही लागली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT