Thane Sarkarnama
ठाणे

Farmer Agitation : जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी मैदानात; शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ ठाण्यात धरणे आंदोलन...

Pankaj Rodekar

Thane News : पंजाब, हरियाणा येथील शेतकरी एमएसपीच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघाले आहेत. मात्र, त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले आहे. त्यांच्यावर गोळीबार, लाठीचार्ज केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरला आहे. तसेच मंगळवारी ठाणे - पालघर विभागीय महिला अध्यक्षा व जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करण्यात आले.

हमीभावासाठी कायदा बनवावा आणि स्वामिनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे. हजारोंच्या संख्येने दिल्लीत येऊ पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच थोपवण्यासाठी हरियाणा सरकारने मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक बलाच्या तुकड्या नियुक्त केल्या आहेत.

दिल्लीच्या सीमेवर तारांचे कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट काँक्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात आंदोलकांनी शेतकऱ्यांवर गोळीबार आता नाही सहन होणार, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, जगाच्या पोशिंद्याला जगू द्या... असे फलक हातात घेतले होते. या वेळी ऋता आव्हाड म्हणाल्या, शेतकरी वर्ग आपल्या न्याय, हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला पहिला राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एकमेव पक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी 2021 मध्ये शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन चिरडण्यात आले होते. त्यानंतर 2014 पासून शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडलेले नाही. स्वामिनाथन आयोगाने शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याची शिफारस केली आहे. त्याची अंमलबजावणी करावी आणि 2021च्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांस अर्थसहाय द्यावे, या साध्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. पण, मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्यात येत आहेत.

पंजाबमधील शेतकरी हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचीही अवस्था वाईट आहे. सामान्य माणसाला महाग झालेल्या चैनीच्या वस्तू विकत घ्यायला आवडते. मात्र, शेतकर्‍यांचा शेतमाल महाग झाला तर बजेट कोलमडते. म्हणूनच शेतकर्‍यांना त्यांच्या मेहनतीची कमाई मिळावी, यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. हे सरकार एका माणसाचे नाही. आज अनेकांना देशाचे कृषिमंत्री कोण आहेत, याचाच पत्ता नाही. त्यामुळे आपण मोदी सरकार असा उल्लेख करू नये, असे आवाहनही ऋता आव्हाड यांनी केले.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT