Udhav Thackeray, Eknath Shinde, Narendra Modi sarkarnama
ठाणे

Thane Loksabha News : खरी शिवसेना आपलीच; त्यांच्याकडे विरघळून जाणारे 'आईस्क्रिम' : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

Pankaj Rodekar

Thane Loksabha News : खरी शिवसेना आपली आहे. धनुष्यबाण आपल्याकडेच आहे. त्यांच्याकडे काय आहे ते काही दिसत नाही. याचदरम्यान कार्यकर्त्यांमधून ‘आईस्क्रीम’ असा उल्लेख झाला. तेव्हा उन्हाळा असल्याने ते ही विरघळून जाईल, असा टोमणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांना लगावला.

ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्री. शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाणे जिल्हा शिवसेना शाखा येथून रॅली काढण्यात आली. यावेळी म्हस्के यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ही रॅली मुस रोड मार्गे ठाणे बाजारपेठेतून चिंतामणी चौक, आनंदआश्रम करत टेंभीनाका येथे विसर्जित झाली.

एकनाथ शिंदे म्हणाले, मागचा उमेदवार आपल्याच मेहनतीवर निवडणूक आला असून आता 400 पार मध्ये नरेश म्हस्के हवे की नको ? असा सवाल करत बूथ स्तरावर जोरदार काम करा. या देशात यापूर्वी बॉम्ब स्फोट आणि आतंकवादी कारवाया झाल्या. मात्र 2014 नंतर एकाने तरी हिंमत केली का अशा कारवाया करण्याची. मोदींनी घरात घुसून मारू असा दम दिला असून केवळ एवढ्यावर न थांबता सर्जिकल स्ट्राईक देखील केले.

मोदी हे देशासाठी निरंतर काम करत असून त्यांनी आणि मी एक दिवसही सुट्टी घेतली नाही. संविधानावर देश चालतो ते कोणीही बदलू शकत नाही. उलट बाबासाहेबांना पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले, हा इतिहास विसरता येणार नाही. 2015 नंतर मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.

नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरून आलो आहे.या ठिकाणी कितीही सभा झाल्या तरी बुथवर काम करायचे आहे, बुथवर काम करून हक्काचे मतदार आपल्याला उतरवायचे आहेत. मागील निवडणुकीत उमेदवाराला लीड कोणी दिली, मेहनत कोणी केली. मोदी सांगतात बुथची लढाई जिंका, मागच्या अनेक निवडणुकांचा रेकॉर्ड आपण तोडू शकतो.

धर्मवीरांना साजेसे असे काम करायचे असून नरेश म्हस्के यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. दोन वर्षात महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती मतदार देतील, असा विश्वास व्यक्त करुन एकनाथ शिंदे म्हणाले, तुमचा मुख्यमंत्री ठाणेकर आहे, म्हणून दोन वर्ष बंद झालेला विकास सुरू झाला. दोन वर्षे सण बंद होते त्यावरचे निर्बंध काढले.

घरात बसून आणि फेसबुकवरून सरकार चालवता येत का? उंटावरून शेळ्या हाकता येतात का? त्यांच्यासाठी जमिनीवर यावे लागते. म्हणून जमिनीवर जाऊन काम करावे लागते. तुमचा हा एकनाथ शिंदे दोन वर्षे काम करतोय. आधी पण, मीच काम करत होतो. क्रेडिट दुसरे घेत होते, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रॅलीत हाणामारी

ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या रॅलीत गुंडांच्या दोन टोळीमध्ये हाणामारी झाली. ही मारामारी कॅमेरात कैद झाली. एकमेकांनी भर रस्त्यात दुश्मनी काढण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्यांनतर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यानंतर परिस्थिती निवळली. मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये मारामारी झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT