Political News : लोकसभा निवडणुकीत 2014 पासून भाजपने मोठे यश मिळवले आहे. मात्र, दुसरीकडे राज्यसभेत भाजपकडे बहुमत नव्हते. मात्र, आता बहुमताच्या जवळपास भाजप पोहचला असतानाच शुक्रवारी भाजपने आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला. आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील दहा खासदारापैकी सात जणांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाने सर्व कागदोपत्री तयारी करूनच राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यसभेत भाजप ऐतिहासिक स्वबळाच्या जवळ आला आहे. याठिकाणी बहुमतासाठी आता एनडीएतील मित्रपक्षाची गरज भासणार नाही.
लोकसभेत 12 वर्षांपासून भाजपचे निर्विवाद वर्चस्व असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपला (BJP) मित्रपक्षावर अवलंबुन राहावे लागले होते. त्यामुळे महत्त्वाचे विधयेक मांडताना त्यांना मित्रपक्षाची साथ घ्यावी लागत होती. राज्यसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप आता येत्या काळात ऐतिहासिक स्वबळाच्या जवळ येणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी देशाच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी बंड करीत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चड्ढा यांच्यासॊबत पक्षाचे इतर सहा खासदारही फोडले असून हा गट भाजपमध्ये विलीन झाला आहे. त्यामुळे हा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का बसला आहे. खासदार चड्ढा यांना काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटविले होते. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून चड्ढा आणि आपमधील दुरावा चांगलाच वाढला होता. चड्ढा यांनी उघडपणे पक्षाला आव्हान दिले होते. अखेर शुक्रवारी त्यांनी राज्यसभेतील अन्य सहा सहकाऱ्यांसोबत बंड केले आहे.
या बंडामुळे आता राज्यसभेत भाजपला मोठे बळ मिळाले आहे. राज्यसभेत बहुमताचा आकडा 123 इतका असून सध्या भाजप स्वबळावर 123 च्या आसपास पोहचला आहे. येत्या काळात भाजपचे दहा सदस्य वाढल्यास भाजपला राज्यसभेत बहुमत प्राप्त होणार आहे. राज्यसभेतील एप्रिल 2026 मधील ताज्या राज्यसभा निवडणुका आणि बदलांनंतर, राज्यसभेतील सध्याचे पक्षनिहाय संख्याबळ पाहता भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आता बहुमताच्या आकड्याच्या जवळ पोहोचली आहे.
राज्यसभेतील एकूण सदस्यांची संख्या- 245 इतकी आहे. त्यामध्ये 233 निर्वाचित सदस्य आहते तर 12 नियुक्त सदस्य आहेत. राज्यसभेत बहुमताचा आकडा 123 इतका असून याठिकाणी सत्ताधारी (NDA) चे संख्याबळ पाहता सध्या 139 सदस्य आहेत. तर दुसरीकडे भाजपचे 106 सदस्य आहेत. नुकत्याच आम आदमी पक्षातील घडामोड पाहता आता भाजपचे सात खासदार वाढणार आहेत. त्यामुळे भाजपची संख्या 113 पर्यंत पोहचणार आहे. तर NDA चे संख्याबळ वाढून आता 146 इतके होणार आहे. राज्यसभेत स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी आणखी दहा खासदरांची आवश्यकता आहे.
शुक्रवारी झालेल्या आम आदमी पक्षातील फोडाफोडीनंतर एकंदरीतच राज्यसभेतील संख्याबळ पहिले तर सत्ताधारी NDA कडे 146 इतके संख्याबळ आहे. भाजप -113, जदयू -4, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष -4, एकनाथ शिंदे यांची शिवसेना-2, इतर मित्रपक्ष- 17, नियुक्त 6.
विरोधी आघाडी असेलल्या I.N.D.I.A. कडील आकडेवारी पहिली तर 68 इतके संख्याबळ आहे. त्यामध्ये काँग्रेस 29, तृणमूल काँग्रेस 13, आप 10, द्रमुक 8, शिवसेना उद्धव ठाकरे 1, इतर 15 असे एकूण 68 संख्याबळ आहे. तर अपक्ष व इतर मिळवून 31 सदस्य आहेत. त्यामध्ये वायएसआर काँग्रेस-7, बीजेडी-3, अपक्ष व रिक्त जागा 21 असे संख्याबळ आहे.
भाजपने गेल्या काही दिवसात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भाजपचे स्वतःचे संख्याबळ एप्रिल महिन्यातच 106 पर्यंत पोहोचवले होते. मार्च-एप्रिल 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत बिहार, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये भाजपला मोठे यश मिळाले होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे संख्याबळ ऐतिहासिक निचांकी पातळीवर असून ते केवळ 29 वर आले आहे. सध्याच्या या संख्याबळामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात महत्त्वाच्या घटनात्मक दुरुस्त्या किंवा विधेयकांबाबत सत्ताधारी भाजप पक्ष अधिक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.