Nitishkumar, Ajit Pawar  Sarkarnama
देश

Lok Sabha Election News : महाराष्ट्रात अजित पवार तर बिहारमध्ये नितीशकुमार प्रचारातून अचानक गायब; कारण आजारपणाचे, चर्चा नाराजीची

Sachin Waghmare

Political News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान लवकरच होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाने प्रचाराची राळ उठवली आहे. तर दुसरीकडे या निमिताने सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण वाढत्या उन्हासोबतच चांगलेच तापले आहे.

नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सॊडत नसल्याने वातावरण शिगेला पोचले आहे. त्यातच प्रचार शिगेला पोचला असतानाच देशातील दोन मोठे नेते गायब असल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे ला मतदान होत आहे.

महाराष्ट्रासाठी हा शेवटचा टप्पा असणार असून मुंबई परिसरातील 13 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने पाचव्या आणि अखेरच्या दोन टप्प्यांसाठी भाजपने (Bjp) प्रचारासाठी जोर लावला असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अचानक प्रचारातून गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Lok Sabha Election News )

विशेष म्हणजे नितीश कुमार हे बिहारमधील महागठबंधन सरकारमध्ये होते. त्या सोबतच इंडिया आघाडीसॊबत ही नितीशकुमार होते. दोन्ही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतला होता. आता निवडणूक मध्यावर आल्यानंतर हेच दोन नेते अचानक गायब झाल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस देशभरातील दिग्गजांनी एकच गर्दी केली होती. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळेस उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे दोघेही आजारी असल्याची चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे पीएम मोदी यांच्या 15 मे रोजी झालेल्या मुंबईच्या रोड शोमध्येही अजित पवार सहभागी झाले नाहीत. दरम्यान, उद्याच्या (17 मे) सभेत अजित पवार सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे सर्वात जवळचे नेते सुशील कुमार मोदी यांच्या निधनानंतर, मंगळवारी त्यांनी पाटण्यात राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले, परंतु नितीश कुमार स्वतः पाटण्यात असूनही दिघा घाटावर गेले नाहीत.

त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिवंगत पत्नी मंजू सिन्हा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 14 मे रोजी पाटण्याच्या कंकरबाग उद्यानातील पुतळ्याच्या ठिकाणी भेट देत होते, त्यांच्या 17 व्या पुण्यतिथीला देखील ते गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या गैरहजर असण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, नितीश कुमार यांच्या आजाराबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. परिस्थिती अशी आहे की ते आजारी कसे? असा प्रश्न थेट मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारीच टाळत आहेत. त्यामुळे नितीशकुमार आजारपणातून बाहेर कधी पडणार याची चर्चा जोरात रंगली आहे.

SCROLL FOR NEXT