Amit Shah, Narendra Modi, BJP Political strategy Sarkarnama
देश

Bihar Election 2025 : मोदी-शाह जोडी काट्याने काटा काढणार! बिहार काबीज करण्यासाठी प्लॅन तयार...

Narendra Modi Amit Shah Strategy BJP Mission Bihar 2025 Election Plan : बिहार काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीने काही विशेष प्लॅन तयार केल्याचे पावलोपावली जाणवत आहे.

Rajanand More

Bihar Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवस बिहारचा दौरा करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या दौऱ्यात त्यांनी गोपालगंज येथे भली मोठी सभा घेत माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालुप्रसाद यादव यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. त्यांनी पक्षातील नेत्यांनाही विजयाचा कानमंत्र दिला. राज्यात अद्याप एकदाही भाजपचा मुख्यमंत्री झालेला नाही. त्यासाठी भाजपने यावेळी कंबर कसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

बिहार काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीने काही विशेष प्लॅन तयार केल्याचे पावलोपावली जाणवत आहे. एकीकडे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना गोंजारले जात आहे. तर दुसरीकडे पक्षाचा मुख्यमंत्री होण्यासाठी नेत्यांनी जोरदारपणे तयारी सुरू केली आहे. जे महाराष्ट्रात घडले, तेच बिहारमध्येही होऊ शकते, याची स्वप्न नेत्यांना पडू लागली आहेत.

बिहारच्या सत्तेच्या मार्गातील भाजपसाठीचा प्रमुख अडसर आहे तो लालूंचा राष्ट्रीय जनता दल. या पक्षाला ताकद यादवांची वोट बॅंक आहे. त्याचप्रमाणे दलित आणि मुस्लिम समाजही बऱ्यापैकी लालूंच्या मागे उभा राहतो. मात्र, लोकसभा निवडणुकीत पक्षाला फारसा प्रभाव दाखवता आला नाही. यामध्ये नितीश कुमारांनी बाजी मारली. भाजपसाठी ही संधी चालून आली आहे. मुस्लिम मतदारांना आकर्षिक करण्यासाठी ईदनिमित्त ‘सौगात ए मोदी’ हा उपक्रम अल्पसंख्याक सेलकडून हाती घेण्यात आल्याने त्याची देशभर चर्चा झाली.

मागील वर्षी केंद्र सरकारने बिहारमध्ये जननायक म्हणून प्रसिध्द असलेले माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. या माध्यमातून भाजपने आधीच दुर्बल घटकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. आता यादव मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याचे दिसते. लालू यादव, राबडी देवी मुख्यमंत्री असताना तसेच त्यांचे पुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात यादवांवर असा अन्याय झाला, हे सांगण्याचे काम नेत्यांवर सोपविण्यात आले आहे.

अमित शाह यांनीही त्यांच्या भाषणात घराणेशाहीचा मुद्दा काढत लालूंनी यादव समाजाकडे कसे दुर्लक्ष केले, हे सांगितले. केवळ लालू यादव यांच्याच कुटुंबाचा विकास झाला. इतर समाजाची आर्थिक आणि सामाजिक उन्नती झाली नाही, अशी टीका शहांनी केली. यापुढचा टप्पा म्हणजे भाजपने अधिकाधिक यादव समाजातील तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लॅन तयार केला आहे.

पुढील काही दिवसांत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्यासारखे शंभरहून अधिक नेते संपूर्ण बिहार पिंजून काढणार आहेत. लालूंच्या काळात यादव समाजावर कसा अन्याय झाला, हे तरुणाईला पटवून दिले जाणार आहे. तसेच केंद्र आणि सध्याच्या राज्य सरकारची कामेही पोहचवली जाणार आहेत. प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावाचा आधार घेत भाजपकडून ही प्रचारमोहिम राबवली जाऊ शकते.

भाजपने अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार असल्याचे नेत्यांकडून सांगितले जात आहे. पण निवडणुकीनंतरही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे ठामपणे कुणीही सांगत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात जे घडले ते बिहारमध्येही घडू शकते, अशी शंका घ्यायला वाव आहे. त्यासाठी भाजपने निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडूण आणण्याची तयारी सुरू केली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT