Uttamrao Patil, Sharad Pawar
Uttamrao Patil, Sharad Pawar Sarkarnama
देश

Sharad Pawar in Nipani : भाजपमुळे कर्नाटकच्या प्रतिमेला तडा; भ्रष्टाचारावरून पवारांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar in Karnataka : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार लढत आहेत. कर्नाटकमध्ये बुधवारी (ता. १०) मतदान होणार आहे. त्या निवडणुकीचा प्रचाराचा सोमवारी (ता. ८) संपला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी निपाणी येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी कर्नाटकातील समस्यांसह मणिपूर राज्यातील हिंसाचार आणि देशातील समस्यांवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

देशभर समस्या असताना पंतप्रधान कर्नाटक राज्यात ठाण मांडून बसल्याची टीका पवार यांनी केली होती. शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले "सध्या कर्नाटकमध्ये निवडणूक असताना देशभरात अनेक समस्या आहेत. सीमेवरील राज्यात शांतता असावी, असे प्रत्येक सरकारचे धोरण असावे. मणिपूरला गेल्या सहा दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. तेथे भाजपचे राज्य आहे. हातात देशाची सत्ता असूनही त्यांना मणिपूर राज्य सांभाळता येत नाही. तेथील प्रश्न सोडवायचे सोडून पंतप्रधान कर्नाटकमध्ये अखंड फिरत आहे. प्रथम त्यांनी हातात असलेल्या सत्तेचा वापर करून मणिपूरमधील हिंसाचार थांबूवून जनतेचे रक्षण करावे."

पैसा आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजपला खड्यासारखे बाजूल करण्याची वेळ आल्याचे आवाहनही पावर यांनी यावेळी केले आहे. पवार म्हणाले, "कर्नाटकमध्येही (Karnataka) भाजपचे राज्य आहे. खरेतर अनेक ठिकाणी भाजप सत्तेत निवडून आलेला नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार फोडून त्यांनी सत्तांतर केले. मध्य प्रदेश आणि अशी अनेक राज्ये सांगता येतील जिथे धनाचा वापर करून माणसे फोडणे आणि त्यातून सरकार बनवणे ही भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. त्याला कर्नाटकही अपवाद नाही. म्हणून या देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे."

भाजपने देशभरात कर्नाटक राज्याची प्रतिमेला तडा गेल्याचा हल्लाबोल पवार यांनी केला. ते म्हणाले, "कर्नाटकात सध्या ४० टक्क्यांसंबंधीच्या नवीन धोरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे धोरण संपूर्ण देशात राबवण्याची इच्छा काहींची दिसते. मात्र मिळालेली सत्ता ही सामान्य माणसाच्या हितासाठी वापरायची असते. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कर्नाटकात विरेंद्र पाटील मुख्यमंत्री होते. इतका स्वच्छ व्यवहाराचा आणि चांगला राज्यकारभार करणारा मुख्यमंत्री कर्नाटकने दिला होता. त्याच कर्नाटकची चर्चा संपूर्ण देशात ४० टक्क्यांचे सरकार म्हणून होत आहे. कर्नाटकची एवढी बदनामी कोणीही केली नाही. त्याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे."

भाजप (BJP) महापुरुषांच्या अपमान करत असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. पवार म्हणाले, कर्नाटक सरकारने देशाला राज्यघटना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाला अशुभ दिवस म्हटले. बाबासाहेबांनी देशाला केवळ घटना दिली नाही तर देशासाठी अनेक धोरणात्मक निर्णयही घेतले आहेत. अशा महान व्यक्तीबद्दल असे वक्तव्य होते. यातून भाजप कष्टकरी, कर्तृत्ववान आणि मागासवर्गीय वर्गाची बदनामी करत आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT