Delhi News : नव्या वर्षातली पहिलीच आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या तिसर्या टर्ममधील ही नववी निवडणूक असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपला धोबीपछाड देत 27 वर्षांनंतर सत्ता काबीज केली.यानंतर आता दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान, एक मोठी घडामोड समोर येत आहे. दिल्लीच्या (Delhi Assembly Election) नायब राज्यपालांकडून महत्त्वाची नोटीस जारी केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळजवळ स्पष्ट झाला आहे. यात भाजप सध्या 70 जागांपैकी भाजप (BJP) 48 जागांवर आणि आप 22 जागा जिंकल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे दिल्लीत सत्तापरिवर्तन होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. त्याचवेळी नायब राज्यपालांनी नोटीस काढून महत्त्वाचे आदेश दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दिल्लीतील सामान्य प्रशासन विभागानं एक आदेश जारी केल्याची माहिती समोर येत आहे.नायब राज्यपाल यांच्यावतीनं जारी केलेल्या नोटिशीमध्ये सचिवालयातून कोणताही कॉम्प्युटर हार्डवेअर आणि दस्ताऐवज बाहेर जाता कामा नये,असे आदेश देण्यात आले आहेत.यामागं सरकारी डेटा आणि सुरक्षेचा मुद्दा पुढे करण्यात आला असून सचिवालय पूर्णपणे सील करण्याबाबतचा उल्लेखही नोटिशीत करण्यात आला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं गेल्या दहा वर्षात तुलनेत जोरदार मुसंडी मारली. 2020 रोजी झालेल्या निवडणुकीत अवघ्या तीन जागा जिंकलेल्या भाजपनं या निवडणुकीत 48 जागांवर जोरदार मुसंडी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजपनं ही निवडणुक पूर्ण ताकदीनिशी लढली होती.काँग्रेसला तर या निवडणुकीत भोपळा मिळाला आहे.
दिल्लीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानतानाच मोठे आश्वासनही दिले आहे. जनशक्ती सर्वोपरी म्हणत त्यांनी हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा असल्याचे म्हटले आहे. हा विजय ऐतिहासिक असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियात दिल्लीतील विजयाबद्दल पोस्ट लिहिली आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात ते आज रात्री जल्लोषात सहभागी होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. पण त्याआधी त्यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिल्लीचा चौफेर विकास आणि येथील लोकांचे जीवन उत्तम बनविण्यासाठी आम्ही कसलीही कसर ठेवणार नसल्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत दिल्लीकरांचे आभार मानले आहेत. ते पोस्टमध्ये म्हणाले, मला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचाही गर्व वाटतो. त्यांनी प्रचंड जनादेशासाठी रात्रं-दिवस एक केले. आता आम्ही आणखी मजबूतपणे दिल्लीवासियांच्या सेवेत समर्पित राहू, असे आश्वासन मोदींनी दिल्लीकरांना दिले आहे.
तसेच जनतेला सतत खोटी आश्वासने देऊन दिशाभूल केली जाऊ शकत नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिले आहे. जनतेने आपल्या मतांनी अस्वच्छ यमुना, पिण्याचे अस्वच्छ पाणी, खड्डेमय रस्ते, ओव्हरफ्लो झालेली गटारे आणि प्रत्येक गल्लीत दारू दुकानांचे उत्तर दिले आहे. ता मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्ली एक आदर्श राजधानी बनेल, असा विश्वास शाहांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.