Revanth Reddy Sarkarnama
देश

Telangana News : भाजप आधी काँग्रेसची बाजी! तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला, रेवंथ रेड्डींच्या नावाची घोषणा

Deepak Kulkarni

Telangana News : पाच राज्यांच्या विधानसभा निकालात भाजपने घवघवीत यश मिळवले तर काँग्रेसही तेलंगणात सत्तेत परतली आहे. पण विजय मिळवूनही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा पेच भाजपमध्ये निर्माण झाला आहे. निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटले तरी तीनही राज्यांच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या नावांची घोषणा करण्यात भाजपकडून अद्याप करण्यात आलेली नाही. याचवेळी काँग्रेसने मात्र, तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी रेवंथ रेड्डी यांच्या नावाची घोषणा करत बाजी मारली आहे.

काँग्रेस हायकमांडला तेलंगणातील मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडविण्यात यश आले आहे. राज्याचे प्रभारी व विशेष निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर पक्षाकडून रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रेड्डी यांच्या नावाची अधिकृत घोषणा काँग्रेसने केली आहे. तसेच त्यांचा शपथविधी सोहळा 7 डिसेंबरला दुपारी 11 वाजता होणार असल्याची माहितीही काँग्रेसने दिली आहे.

तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेड्डी यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. तसेच राज्यातील बहुतेक आमदारांनी रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांच्याच नावाला पसंती दर्शवली होती.तेलंगणामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसला एवढं मोठं यश मिळवून देण्यात त्यांचाच मोठा वाटा असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे रेवंथ हेच तेलंगणाचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे बोलले जात होते. आणि ते खरेही ठरले.

लोकसभेआधी झालेल्या निवडणुकीत तेलंगणामध्ये (Telangana News) काँग्रेसला ६५ जागा मिळाल्या आहेत. या यशामुळे भाजपचं दक्षिण भारतातील विजयाच्या स्वप्नंही भंगले आहे. मात्र, भाजपचं तगडं आव्हान परतवून लावण्यात रेड्डी यांचा मोठा हात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीआधी काँग्रेसने (Congress) त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.त्यांनी राज्यभर झंझावती दौरा करून केसीआर सरकारविरोधात वातावरण तयार करण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे प्रकरण प्रलंबित असल्याने काही आमदारांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला विरोध केल्याचेही समोर आले होते. पण अनेक आमदारांनी रेवंथ रेड्डी यांच्याच नावाला पसंती दिल्याने काँग्रेस हायकमांडने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

काँग्रेसकडून येत्या 7 डिसेंबरला त्यांचा शपथविधी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत आणखी काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.हैदराबादमध्ये सोमवारी झालेल्या नवनियुक्त आमदारांच्या बैठकीतच रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT